खेड-आळंदीत 66.44 टक्के मतदान
राजगुरूनगर – खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात सरासरी 66.44 टक्के शांततेत मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय तेली यांनी दिली. खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात एकूण 379 केंद्रावर मतदान शांततेत झाले. एकूण 9 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. येथे तिरंगी लढत झाली आहे. विद्यमान
आमदार सुरेश गोरे (शिवसेना), माजी आमदार दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस), तर अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांच्यात “काटे की टक्कर’, झाली आहे. मतदार संघात 3 लाख 27 हजार 262 आहे. पैकी 1 लाख 70 हजार 940 पुरुष तर 1 लाख 56 हजार 318 महिला मतदार आणि इतर चार मतदार आहेत. आज सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली. तालुक्यात शनिवार, रविवार असा दोन दिवस जोरदार पाऊस सुरु होता. मात्र मतदानाचा दिवस उजाडल्यावर पावसाने उसंत दिली. सकाळी सुरुवातीला मतदानाचा ओघ कमी होता. मात्र दहानंतर मतदार स्वत:हून घराबाहेर पडत रांगा लावून मतदान करत होते.
शहर आणि ग्रामीण भागात समान स्थिती होती. दुपारी एक वाजे पर्यंत तालुक्यात 32.21 टक्के मतदान झाले होते. दुपारी वेग काहीसा मंदावला. सायंकाळच्या सत्रात पुन्हा मतदारांच्या रांगा लागल्या. पाच वाजता 61.39 टक्के मतदान झाले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्यात वाढ होऊन सरासरी 66 टक्क्यांच्या वर गेली.