मुंबई: विधानसभा निवडणूकीत यंदाही युती होणार अशी घोषणा करणाऱ्या शिवसेना-भाजपाचा जागावाटपावरून काथ्याकूट चालला आहे. दोन्ही पक्षांच्या जागावाटपाचा आकडा अजूनही ठरला नसतानाच महायूतीमधील भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या खासदार रामदास आठवले यांच्या रिपाइंने 10 जागांची मागणी केली आहे. मात्र, आगामी निवडणूक आमचे उमेदवार भाजपच्या निवडणूक चिन्हावर नव्हे तर स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर लढविण्यात येतील याचा आठवले यांनी पुनरुच्चार केला आहे.
मुंबईतील चेंबूर, मानखुर्द शिवाजीनगर, धारावी, कुर्ला, वेसावे. चांदिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, कर्जत खालापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, नाशिक देवळाली, श्रीरामपूर, भुसावळ, चाळीसगाव, भंडारा. चंद्रपूर, पांढरकवडा, बडनेरा, केज, उदगीर, गंगाखेड, पिंपरी, पुणे कॅंटोमेंट, माळशिरस, फलटण अशा 26 जागांमधून 10 जागांची मागणी आठवले यांनी भाजपकडे केली आहे.
अयोध्येत राम मंदिराचे निर्माण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा करावी लागेल असे आठवले यांनी सांगितले. तसेच भारतीय खेळांमध्ये अनुसुचित जाती, अनुसूचित जमातींसाठी आरक्षण ठेवण्यात यावे अशी मागणी आठवले यांनी केली आहे. केंद्र सरकारपुढे देशातील आर्थिक मंदीचे आव्हान मोठे असले तरी यातून मोदी सरकार यशस्वी मार्ग निश्चितपणे काढील असा दावाही आठवले यांनी केला आहे.