मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सर्वच पक्षांकडून सुरु असल्याचे दिसत आहे. शिवसेना-भाजप युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीमुळे अनेकांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे या इच्छुकांनी बंडखोरीचे आव्हान दिले आहे.
बंडखोऱ्याचे सर्वात जास्त आव्हान शिवसेना-भाजपच्या महायुतीला आहे. कारण 27 मतदारसंघामध्ये 114 बंडखोर महायुतीच्या उमेदवारांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे रविवारपासून या बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून सुरु आहे. त्यामुळे आज कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल 5 हजार 543 उमेदवारांपैकी 4 हजार 743 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने 800 उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत.