कोपरगाव (प्रतिनिधी ) : कोपरगाव बसस्थानकाच्या आगारातील कर्मचारी गाडयांची देखभाल दुरुस्ती करण्या ऐवजी खुलेआम आगारात पत्ते खेळत बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि कोपरगाव आगारातील कर्मचारी रातोरात चर्चेत आले.
या घटनेची अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान शहादा आगाराची एक बस पुण्यावरून शहाद्याकडे प्रवाशी घेवून जात असताना बसच्या चाकात हवा कमी असल्याचे व टायर गोटा झाल्याने रस्त्यावर अपघात होवून प्रवाशांच्या जीवाला धोका होवू शकतो.
तेव्हा त्वरीत चाकात हवा भरावी म्हणून संबंधीत बसचा चालक कोपरगाव बस स्थानकात गाडी आल्या बरोबर आगाराच्या कार्यशाळेत जावून चाकात हवा कमी आहे. तेव्हा भरुन देण्याची विनंती कोपरगाव आगारातील कर्मचाऱ्यांना केली .
मात्र, एकञ बसुन पत्ते खेळण्यात मग्न असेल्या कर्मचाऱ्यांनी संबंधीत चालकाला हवा भरणार नाही असे खडसावून सांगत त्या चालकाची व वाहकाची उलट तपासणी करीत त्यांचीच अक्कल काढली. पत्ते खेळत खेळत बसचालकाशी हुज्जत घालुन गाडीच्या चाकात हवा भरण्या ऐवजी दमदाटी करुन वाहकाला व चालकाला पिटाळून लावले.
कमी हवा असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका होवू शकतो, यामुळे वैतागलेल्या बस चालकाने व वाहकाने पत्ते खेळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ काढुन संबंधीत विभागाच्या ग्रुप वर व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल होताच पत्ते खेळणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांच्या डोक्यातील हवा जाग्यावर कमी झाली. कोपरगावचे आगार प्रमुख अभिजीत चौधरी यांना वरिष्ठांचे फोनवर फोन येताच पत्ते खेळणाऱ्या ६ कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु केली तर पत्ते खेळताना त्यांच्या आजु बाजूला काम न करता बसलेल्या बघ्यांनाही धारेवर धरत कारवाईचा बडगा उगारला आहे.
या घटनेबद्दल आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांनी खंत व्यक्त करुन झालेल्या प्रकाराबद्दल आपल्याला लाज वाटत आहे. काही कर्मचाऱ्यामुळे संपूर्ण आगाराची सर्वञ बदनामी झाली आहे. संबंधीतांवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, कोपरगाव आगारात सध्या ७० बस गाड्या असुन त्यापैकी केवळ ३० प्रवाशी वाहतुक करीत आहेत तर १३ गाड्या मालवाहतूक करण्यासाठी धावत आहेत. उर्वरित सर्व गाड्या अनेक महिन्यापासून जाग्यावर उभ्या आहेत. दररोज ७ ते ८ लाखांचे उत्पन्न असणाऱ्या या आगाराला सध्या दररोज केवळ दिड ते पावणेदोन लाखांचे उत्पन्न होत असल्याने तोट्यात असलेल्या आगारात कर्मचारी कामावर असताना कामे करण्या ऐवजी पत्ते खेळून वेळ घालवत असतील तर कोपरगावची लालपरी कशी बरी होईल बरी, अशी खंत व्यक्त केली जात आहे.