नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीरपणे त्यांच्याच पक्षाच्या नेहमी चर्चेत असलेल्या खासदार महुआ मोईत्रा यांना पक्षाने ठरवून दिलेल्या मर्यादेत राहण्याचा इशारा दिला. ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या महुआ मोईत्रा यांना अत्यंत कठोर शब्दात दिलेला इशाऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
नरेंद्र मोदी सरकारवर अनेकदा हल्लाबोल करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांना त्यांच्याच पक्षाकडून जबरदस्त फटकारण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांनी महुआ यांना त्यांची वागणूक सुधारण्याचा इशारा दिला. कोणतेही पद कायमस्वरूपी टिकणार नाही असाही संदेश त्यांनी महुआ मोईत्रा यांना दिला.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गुरुवारी नादिया जिल्ह्यात प्रशासकीय आढावा बैठकीत बोलत होत्या. अचानक ममता म्हणाल्या, “आणि महुआ, मला तुम्हाला एक स्पष्ट संदेश द्यायचा आहे. कोण कोणाच्या विरोधात आहे हे मला जाणून घ्यायचे नाही. तुम्ही तुमच्या लोकांना यूट्यूब, डिजिटल माध्यम किंवा वर्तमानपत्रात दिसण्यासाठी तयार करत आहात. असे राजकारण काही दिवस चालू शकते, पण फार काळ चालणार नाही. कोणतीही व्यक्ती एका विशिष्ट पदावर कायम राहू शकत नाही.”असा इशाराच यावेळी दिला आहे.
महुआ, मी इथे स्पष्ट संदेश देत आहे. कोण कोणाच्या विरोधात आहे हे पाहण्याची गरज नाही, पण निवडणुका होतील तेव्हा कोण लढणार आणि कोण नाही हे पक्ष ठरवेल. त्यामुळे येथे दुमत नसावे. तीच व्यक्ती कायमची त्याच पदावर असेल अशी कल्पना करण्याचे कारण नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. महुआ यांचे नाव घेत त्यांनी सांगितले की, मला या प्रकरणी स्पष्टपणे बोलायचे आहे. तृणमूलच्या नादिया जिल्हाध्यक्षपदावरून हटवण्यात आलेल्या महुआ मोईत्रा या कार्यक्रमात ममता बॅनर्जींच्या मागेच बसल्या होत्या.
राज्यात तोडफोड झाल्याचे एका व्यक्तीने म्हटल्यानंतर ममता यांनी, “हे कोणी केले हे मला माहीत आहे. पोलीस, एडीजी कायदा आणि सुव्यवस्था आणि सीआयडी यांच्याकडून मी याचा तपास केला आहे. ही एक नाट्यमय घटना होती आणि ती प्रसारमाध्यमांमध्ये पसरली होती. आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे,” असे म्हटले.
महुआ मोईत्रा पश्चिम बंगालमधील कृष्णनगर मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे त्या अनेकदा वादातही आल्या आहेत. संसदेच्या आत आणि बाहेर त्यांनी अनेकजा नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.