– सतेज औंधकर
कोल्हापूर – सध्या राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. एफ आर पी चे तीन तुकडे करण्याचे हालचाली सुरू असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.
याच अस्वस्थतेतून कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी येथील शेतकऱ्याने एफ आर पी चे तीन तुकडे होऊ नयेत यासाठी जो नेता पुढाकार घेईल त्याला आपली बागायती एक एकर जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील राजगोंडा पाटील हे प्रगतिशील शेतकरी आहेत. त्याचबरोबर ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही आहेत. त्यांची स्वतःची 18 एकर बागायती जमीन आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून ऊस पीक घेतात. सध्या एफ आर पी चे तीन तुकडे करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
त्यामुळे अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. हा प्रश्न निकालात लागावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. माजी खासदार राजू शेट्टी हे यासाठी पुढाकार घेत आहे, मात्र काही नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एफ आर पीचे तीन तुकडे थांबवू असा दावा करत आहेत.
त्यामुळे राजगोंडा पाटील यांनी महाराष्ट्रातील 288 आमदार आणि 48 खासदार यांना आव्हान दिले. एफ आर पी चे तीन तुकडे होऊ नयेत यासाठी कोणीही पुढाकार घ्यावा आणि हे थांबावा मी त्याला स्वतःची एक एकर बागायती जमीन बक्षीस देईन.