नगर – नगर जिल्ह्यात करोनाबळींची संख्या दररोज वाढतच आहे. रुग्णसंख्या वाढीसोबत किती जणांना मृत्यू झाला, याबाबत प्रशासन दररोज संख्याही कळवित आहे. तथापि, प्रशासन कळवित असलेली संख्या आणि नगरच्या विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेहांची संख्या, यात मोठीच तफावत दिसून येत आहे. करोनाबाधितांवर होणारे अंत्यसंस्कार पाहून नगरमध्ये मृत्यूचे तांडव सुरु झाल्याचा भास होत आहे. तो नगरकरांसाठी भीतीदायक आहे.
नालेगाव अमरधाममध्ये दोन विद्युत दाहिन्यांमधून करोनाबळींवर अंत्यस्कार केले जात आहेत. तथापि, त्यासाठी लागणारा वेळ नातेवाईकांची सत्वपरीक्षा घेणारा ठरत आहे. प्रशासनातर्फे काल जाहीर करण्यात आलेल्या मृत्यूचा आकडा 15 होता. मात्र, नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीतील दाहिनीत किमान 42 करोनाबाधितांवर अंत्यसंस्कार झाल्याची माहिती खासगीत दिली जात आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा करोनाबळींची संख्या लपविण्याचाही प्रयत्न सुरु झाल्याचे दिसते. दरम्यान, नगर शहरातील एकाही रुग्णालयात आज नवीन रुग्णांना भरती करण्यास जागा शिल्लक नाही. करोनाशिवाय अन्य कोणत्याही आजारांच्या रुग्णांना देखील ऍडमीट करुन घेण्यास रुग्णालये असमर्थता दर्शवित आहेत. प्रत्येक रुग्णालयातील बेड हाऊसफुल्ल झाली आहेत.
– जमेल तसे उरका…!
करोनामुळे काल सायंकाळी मृत्यू झालेल्या एका बाधिताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दुपारी दोन वाजले होते. त्यामुळे विलंबाबाबत नातेवाईक नाराज होते. ते तक्रार करत होते. या असुविधेची माहिती कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना देण्याचा प्रयत्न केला. तथापि, वरिष्ठांनी “जमेल तसे उरका’, असे प्रत्युत्तर कर्मचाऱ्यांना दिले. करोनामुळे मृत्यू झालेल्या बाहेरगावच्या बाधितांवरही नगरमधील विद्युत दाहिनीतच अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे त्यांना अंत्यसंस्कारासाठी किती वेळ लागेल?हे कुणालाही सांगात येत नसल्याचे भीषण वास्तव आहे. परिणामी केवळ ताटकळतच बसावे लागेल, अशी स्थिती आहे.
एकाच शववाहिकेत पुन्हा उतरंड…!
करोनाबळींची संख्या वाढत असल्याने ते मृतदेह अमरधामपर्यंत पोचविण्यासाठी प्रशासनाची दमछाक सुरु झाली आहे. एकाच शववाहिनीत करोनाबळींचे मृतदेह एकावर रचून नेल जात असल्याचा एक व्हिडीओ काल व्हायरल झाला. तथापि, त्याचा येथील प्रशासनाने इन्कार केला आहे. असा प्रकार झाला नसल्याचे प्रशासन सांगत आहे. तथापि, वैद्यकीय अधिकारी आता खासगीत बोलताना पर्यायच नसल्याचे हताशपणे सांगत आहेत.