नागपूर, अकोला, औरंगाबादमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता
मुंबई : बंगालच्या उपसागरातून आग्नेय दिशेने वाहणाऱ्या वारे आणि अरबीसमुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पुढच्या 48 तासांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
नागपूर, अकोला, औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर मुंबईसह कोकण भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
मुंबईच्या उपनगरांमध्ये तुरळक पावसाची शक्यता असल्याचेही सांगण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, डहाणू, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पुणे येथे देखील हवामान प्रामुख्याने कोरडेच राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस मुंबई आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.
तर नागपुरात तापमानाचा पारा 5 अंशांपर्यंत खाली गेल्याने नागपुरकरांना चांगलीच हुडहुडी भरली होती. पुढील 48 तास विदर्भ मराठवाड्यात रात्री तापमानाचा पारा खाली घसण्याची शक्यता आहे. तर दिवसा ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आकाशात ढगाळ वातावरण असल्यानेrain पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
आधीच महिनाभर थंडी येण्यासाठी उशीर झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यात अवकाळी पावसामुळे संत्री, गहू, हरबरा, द्राक्ष यांसारख्या पिकांचे नुकसान होऊ शकते. या पावसानंतर राज्यात थंडीचा कडाका वाढू शकतो, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.