मुंबई : जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील या विजयी झाल्या आहेत. अंजली पाटील यांच्या उमेदवारीरून गोंधळ देखील झाला होता. मात्र, हायकोर्टाने त्यांच्या उमेदवारीला मान्यता दिली होती.
अंजली पाटील निवडणुक जिंकल्याने त्या आता जळगाव जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथी लोकप्रतिनिधी ठरल्या आहेत. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल जाहीर होताच एका विशेष उमेदवाराच्या विजयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक या गावातील अंजली पाटील ह्या तृथीयपंथी आहेत, म्हणून त्यांचा अर्ज नाकरण्यात आला होता. मात्र आज जाहीर झालेल्या निकालात अंजली पाटील यांचा दणदणीत विजय झाला असल्याचे समोर आले आहे. अंजली पाटील यांनी वॉर्ड क्रमांक चारमधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तिच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो बाद केला.
तृतीयपंथी असल्याने तिला महिला प्रवर्गातून उमेदवारी करता येणार नाही, मतदार यादीतही तिच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख ‘इतर’ असा असल्याने तिला उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, अंजलीने हार मानली नाही. तिने आपली सहकारी तृतीयपंथी शमिभा पाटील हिच्या मदतीने न्यायासाठी थेट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावले. न्यायालयात कायदेशीर बाजू मांडल्याने तिला न्याय मिळाला. त्यामुळे शेवटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तिची उमेदवारी मान्य करावी लागली होती.