पुणे – करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोरेगाव भिमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात नागरिकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
कोरेगाव भिमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने सोमवारी राज्यमंत्री देसाई यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील उपस्थित होते.
राज्यमंत्री देसाई म्हणाले, मार्चपासून आपण सर्वजण करोनाचा सामना करत आहोत. आषाढी वारी, कार्तिकी वारी, दसरा, दिवाळी यासारखे सर्व सण-समारंभ आपण गर्दी न करता साधेपणाने साजरे केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमदेखील प्रशासनाच्या नियमांचे पालन करून साजरा करायला हवा. नागरिकांच्या सोयीसाठी अभिवादन कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अभिवादन कार्यक्रमासाठी गर्दी करू नये, असे आवाहन राज्यमंत्री देसाई यांनी केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवा, अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती नागरिकांना देऊन त्यांच्याशी संवाद ठेवा, अशा सूचना राज्यमंत्री देसाई यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला दिल्या.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक देशमुख यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखून विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.