तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय
कॅनबेरा – कर्णधार ऍरन फिंच व ग्लेन मॅक्सवेल यांच्या दमदार फलंदाजीनंतरही यजमान ऑस्ट्रेलियावर भारतीय संघाने 13 धावांनी मात करत एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरील पहिलाच विजय नोंदवताना भारतीय संघाने व्हाइटवॉशची नामुष्कीही टाळली.
भारतीय संघाने विजयासाठी ठेवलेल्या 303 धावांच्या अव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 49.3 षटकांत 289 धावांवर संपला. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत यजमान ऑस्ट्रेलियाने ही मालिका यापूर्वीच खिशात टाकली असली तरीही प्रतिष्ठा राखण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे बनले होते. यंदाच्या मोसमात भारतीय संघाने खेळलेल्या सहा सामन्यात हा पहिलाच विजय ठरला.
भारताने ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना फिंचने एक बाजू लावून धरली होती. मात्र, त्याला समोरून फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. या मालिकेत सलग दोन शतके फटकावणारा स्टिव्ह स्मिथ लवकर बाद झाल्याने त्यांच्यावर दडपण आले. त्याचवेळी भारतीय गोलंदाजांनी अत्यंत शिस्तबद्ध गोलंदाजी केली व त्यांच्या फलंदाजांच्या आक्रमक खेळावर अंकुश राखला. फिंचने आपल्या 75 धावांच्या खेळीत 82 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी केली.
मोझेस हेन्रीक्स, कॅमेरुन ग्रीन, ऍलेक्स कॅरी व ऍश्टन अगर यांनी उपयुक्त फलंदाजी केली मात्र, त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. फिंचसह हे फलंदाज तंबूत परतल्यानंतर धडाकेबाज मॅक्सवेलने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्याने चौफेर फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजीवर दडपण आणले.
यावेळी हा सामनाही यजमान संघ सहज जिंकेल असे वाटत होते. त्यावेळी त्यांना 36 चेंडूत 39 धावांची गरज होती. मात्र, त्याचवेळी मॅक्सवेल जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला व तिथेच ऑस्ट्रेलियाचा पराभवही स्पष्ट दिसू लागला. मॅक्सवेलने 38 चेंडूत 3 चौकार 4 षटकार फटकावत 59 धावांची खेळी केली.
भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 गडी बाद केले. बुमराह व टी. नटराजन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. कुलदीप यादव व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अष्टपैलू द्वयी हार्दिक पंड्याच्या 92 धावा व रवींद्र जडेजाची वादळी खेळी तसेच कर्णधार कोहलीच्या उपयुक्त अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 50 षटकांत 5 बाद 302 धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी मयंक आग्रवाल, महंमद शमी, नवदीप सैनी व युजवेंद्र चहल यांना विश्रांती दिली गेली व त्यांच्याजागी यॉर्करकिंग टी. नटराजन, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर व कुलदीप यादव यांना संधी देण्यात आली. भारताचा डाव सुरू झाल्यावर सलामीवीर शिखर धवन केवळ 16 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार कोहली व शुभमन गिल यांनी संघाचा डाव सावरला. स्थिरावल्यानंतरही गिल अत्यंत बेजबाबदार पद्धतीने फटका मारून 33 धावांवर बाद झाला. श्रेयस अय्यर सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. त्याने 19 धावा केल्या. पाठोपाठ भरात असलेला लोकेश राहुलही अवघ्या 5 धावा काढून तंबूत परतला. या वेळी भारतीय संघाची अवस्था 4 बाद 123 अशी बिकट बनली होती.
समोरून अव्वल फलंदाज बाद होत असताना कोहलीने मात्र, एक बाजू लावून धरली होती. त्याने 23 वी धावा घेताना एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या 12 हजार धावा पूर्ण केल्या. अर्धशतकही थाटात पूर्ण करणारा कोहली शतकही साकार करेल असे वाटत असतानाच पुन्हा एकदा जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला.
या मालिकेतील तीनही सामन्यात कोहलीला त्यानेच बाद केले आहे. जागतिक दर्जाच्या गोलंदाजीला गुलाम बनवणारा कोहली हेझलवूडकडून गेल्या दीड वर्षांत चौथ्या वेळी बाद झाला आहे. कोहलीने 78 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने संयमी 63 धावांची खेळी केली. त्यानंतर भारतीय संघ त्रिशतकी धावाही गाठू शकणार नाही असे वाटत होते. मात्र, पंड्या व जडेजा यांनी सामन्याचे चित्रच पालटून टाकले. या दोघांनी 6 व्या गड्यासाठी दीडशतकी भागीदारी केली व संघाला 50 षटकांत 5 बाद 302 धावा अशी समाधानकारक मजल मारून दिली.
अखेरच्या षटकांत जडेजाच्या वादळी फलंदाजीमुळे पंड्याला आपले शतक मात्र पूर्ण करता आले नाही. तो 92 धावांवर तर जडेजा 66 धावांवर नाबाद राहिला. पंड्या पेक्षा जडेजा जास्त आक्रमक होता. पंड्याने 76 चेंडूत 7 चौकार व 1 षटकार फटकावताना नाबाद 92 धावा केल्या. जडेजाने 50 चेंडूत 3 षटकार व 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 66 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ऍश्टन अगरने 2 बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
भारत – 50 षटकांत 5 बाद 302 धावा. (शुभमन गील 33, विराट कोहली 63, हार्दिक पंड्या नाबाद 92, रवींद्र जडेजा नाबाद 66, ऍश्टन अगर 2-44). ऑस्ट्रेलिया – 49.3 षटकांत सर्वबाद 289 धावा. (ऍरन फिंच 75, ग्लेन मॅक्सवेल 59, शार्दुल ठाकूर 3-51, जसप्रीत बुमराह 2-43, टी. नटराजन 2-70).