सूर्यवंशी मळा येथे ड्रेनेजसाठी खोदकाम केलेल्या खड्ड्यामुळेच दुर्घटना घडल्याचा नागरिकांचा आरोप
कराड – येथील बारा डबरे परिसरातील सूर्यवंशी मळा येथे ड्रेनेजसाठी खोदकाम केलेल्या खड्ड्यात पडून एकजण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. विजय पांडुरंग शिंदे असे संबंधित व्यक्तीचे नाव आहे. कराड नगरपालिकेचे दुर्लक्ष व ठेकेदाराचा हलगर्जीपणा यामुळेच ही घटना घडली असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. यापूर्वीही अशा घटना घडल्याची उदाहरणे असताना पालिका प्रशासनाला जाग का येत नाही? पालिकेला आणखी किती बळी हवे आहेत असा सवाल उपस्थित होत आहे.
कराड शहरातील रस्त्यांची कामे करून साधारण एक वर्ष झाले असेल. मात्र एका वर्षाच्या आत सततची खुदाई, अतिवृष्टी यामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांची कामे होण्यापूर्वी पालिकेने पाइपलाइनची कामे करून घेणे गरजेचे होते. परंतु तसे न करता अगोदर रस्त्यांची कामे करण्यात आली. आणि आता पाइपलाइनची कारणे दाखवून सतत खुदाई केली जात आहे. ठेकेदारांच्या फायद्याचा पालिका प्रशासन काळजी घेत आहे का? असा सवालही नागरिकांमधून विचारला जात आहे.
कराड शहराची विद्येचे माहेरघर म्हणून ओळख आहे. परंतु लाखो रूपये खर्च करूनही तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने खड्ड्यांचे माहेरघर म्हणून नव्याने ओळख होऊ लागली आहे. रस्ता तयार करणे, पाइपलाइन व इतर कामासाठी खुदाई करणे, कामाला दिरंगाई करणे, अपूर्ण काम ठेवून खड्डे मुजवणे हे आता कराडकरांना नेहमीचेच झाले आहे. चोवीस बाय सात योजनेचे तर गेली बारा वर्षे कारण पुढे केले जात आहे.
या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागते. भेदा चौक ते कार्वे नाक्यापर्यंतच्या पाच मिनिटांच्या अंतराला दहा मिनिटे लागतात. येथून दररोज ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता हेच कळेना झाले आहे. अनेकवेळा निवेदने देवून, तक्रारी करूनही काही फरक पडत नाही. तात्पुरती मलमपट्टी करणे आणि पुन्हा थातुरमातुर कारण पुढे करून रस्ता उकरण्याचे प्रकार चालू आहेत.
वास्तविक पाहता पालिकेने एखाद्या ठेकेदाराला काम दिल्यानंतर ते काम वेळेत व दर्जेदार करून घेणे हे पालिकेचे मुख्य काम आहे. परंतु एकदा टेंडर दिल्यानंतर पालिका प्रशासन त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. सूर्यवंशी मळा ते बर्गेमळा येथे गेली अनेक दिवस ड्रेनेजच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले होते. मात्र तेथे काम सुरू असल्याचा कोणताही सूचना फलक लावण्यात आलेला नाही.
उर्वरित रस्त्यावर चिखल साचला आहे. याचा अंदाज न आल्याने सदर वाहनधारकाचा ताबा सुटून गाडी खड्ड्यात जाऊन वाहनधारकाचा जागीच मृत्यू झाला. अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडलेल्या असताना पालिकेकडून खबरदारी घेतली जात नसल्याबाबत नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. आणखी किती बळी घेतल्यानंतर पालिकेला जाग येणार? असा सवाल उपस्थित होत आहे.