नवी दिल्ली -उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक 6 ऑगस्टला होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणीही होईल. विद्यमान उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला समाप्त होणार आहे. त्याआधी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड होईल. उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचेही अध्यक्ष असतात.
निवडणूक आयोगाने बुधवारी उपराष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्या निवडणुकीची अधिसूचना 5 जुलैला जारी होईल. उमेदवारी अर्ज 19 जुलैपर्यंत सादर करता येऊ शकतील. त्या अर्जांची छाननी 20 जुलैला होईल. उमेदवारी मागे घेण्यासाठी 22 जुलै ही अंतिम मुदत आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदार म्हणून केवळ राज्यसभा आणि लोकसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य पात्र असतात.
त्यामुळे त्या निवडणुकीसाठी एकूण 788 खासदार मतदार असतील. त्या निवडणुकीसाठी संसद भवनात मतदान होईल. संसदेतील संख्याबळ पाहता भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सत्तारूढ आघाडीचा (एनडीए) उमेदवार सहज विजय मिळवू शकतो. राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणेच उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठीही विरोधक संयुक्त उमेदवार देणार का, याविषयी उत्सुकता आहे.