कोपरगाव – कोपरगाव नगरपालिकेमध्ये भाजपचे उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी युतीचा धर्म पाळला. अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होताच आपल्या नेत्यांच्यासाक्षीने राजीनामा देऊन मित्रपक्षाला उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळावी, यासाठी सहकारी नगरसेवकांच्या समक्ष कार्यालयीन अधिकारी पाटील यांच्याकडे राजीनामा दिला.
वाजे यांच्या राजीनाम्याने शिवसेनेच्या गटाला उपनगराध्यक्षपदाची संधी निर्माण झाली आहे. यावेळी वाजे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की गेल्या अडीच वर्षांपासून सेना-भाजप युतीच्या नगरसेवकांनी खेळीमेळीच्या वातावरणात शहराच्या विकासाला कोणतीही बाधा येणार नाही, विकास कामाला विरोध न करता पालिकेत सहकार केले. पक्षश्रेष्ठींच्या शब्दाला मान देत मित्र पक्षाचा आदर ठेवून आपण राजीनामा दिला आहे.
दरम्यान विवेक कोल्हे म्हणाले, मित्रपक्षांना संधी देण्यासाठी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये वाजे यांनी राजीनामा देऊन सहकार्य केले. कोपरगाव शहरामध्ये सध्या व्हाट्सऍप पुढारी जास्त झाले आहेत. स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते राजकारण करीत आहेत. विकासाच्या मूळ मुद्द्याला बगल देऊन तथ्य नसणाऱ्या गोष्टींवरती चुकीचे आरोप करीत जनतेची दिशाभूल करीत आहेत.
दरम्यान उपनगराध्यक्ष विजय वाजे यांचा राजीनामा देण्यापूर्वी पालिकेमध्ये लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यात आला.
यावेळी विवेक कोल्हे यांच्या समवेत भाजपचे पराग संधान, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, शिवसेनेचे गटनेते योगेश बागूल, नगरसेवक स्वप्नील निखाडे, नगरसेविका भारती वायखिंडे, मंगल आढाव, हर्षा कांबळे, विद्या सोनवणे, दीप्ती गिरमे, ताराबाई जपे यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरसेविका शिवसेना-भाजप पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
वाजे राजीनामा देण्यासाठी गेले असता पालिकेमध्ये नगराध्यक्ष हजर नव्हते. मुख्याधिकारी शासकीय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे वाजे यांनी आपल्या पदाचा राजीनामा कार्यालये अधिकारी पाटील यांच्याकडे सुपूर्त केला.
वाजे यांच्या राजीनाम्याने सेनेच्या नगरसेवकांमधून उपनगराध्यक्ष पदाची कोणाच्या गळ्यात पडते, याकडे लक्ष लागले आहे. पालिकेमध्ये शिवसेनेचे सहा नगरसेवक आहेत, तर भाजपचे 14 नगरसेवक. सहा नगरसेवकांपैकी कोणाला संधी मिळणार, यावर विचार मंथन शिवसेना उद्या (दि.24) करणार आहे. नुकताच कार्यकर्त्यांचा मेळावा शिवसेनेने आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या अगोदरच नगरसेवक कार्यकर्त्यांची बैठक होऊन यातून उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेनेमधील अंतर्गत दोन गटांमुळे कोणाला संधी मिळेल, याकडे शहराची लक्ष वेधले आहे.