नवी दिल्ली – देशात नवोन्मेशवृत्ती आणि स्वयंउद्यमशीलता वाढीस लागेल, यासाठी पोषक वातावरण तयार करण्याची गरज आहे, असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. “आत्मनिर्भर भारता’च्या निर्मितीसाठी, भारतीयांनी “लोकल’ म्हणजेच स्थानिक उत्पादनांचा वापर सुरू करत, “ग्लोबल’ म्हणजे देशी उत्पादनांना जागतिक ब्रॅन्ड बनवण्यासाठी, पर्यायाने भारताला “ग्लोकल’ बनवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.
“ग्लोबल’ आणि “लोकल’ या दोन्ही शब्दांना एकत्रित करून “ग्लोकल’ अशा शब्द उपराष्ट्रपतींनी वापरला. उपराष्ट्रपती भवनातून “एलिमेंट’ या स्वदेशी बनावटीच्या मोबाइल अॅपचे त्यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यामातून उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
एलिमेंट अॅपमध्ये कोणत्या सेवा मिळणार….
या अॅपमध्ये चॅटिंगसह वापरकर्त्यांना ई-कॉमर्स सेवा देखील मिळतील. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांचा डेटा संरक्षित करण्यासाठी एंड-टू-एंड एनक्रिप्शन सारख्या वैशिष्ट्ये प्रदान केल्या आहेत. हे अॅप आठ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. त्याचबरोबर हा अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपलच्या अॅप स्टोअरवरही उपलब्ध आहे.
आत्मनिर्भर भारत अभियानाचा उद्देश देशाच्या आर्थिक क्षमतांना नवे बळ देऊन, एक मोठी झेप घेणे हा आहे. त्यासाठी, पायाभूत सुविधा अधिक मजबूत बनवणे. मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर, मनुष्यबळ अधिक कुशल करणे आणि एक दर्जेदार पुरवठासाखळी विकसित करणे हा आहे, असेही ते म्हणाले.
देशात विविध ठिकाणी असलेल्या, अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रातील गुणवत्ता आणि ऊर्जेला अधिक झळाळी देणे, हाच या अभियानाचा उद्देश आहे. स्वयंउद्यमशीलतेला प्रोत्साहन, अभिनव कल्पनांना पाठबळ देत भरारी घेण्यासाठीचा हा पाया आहे, ज्यातून शहरी आणि ग्रामीण भारताचा एकत्रित विकास होणार आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. “आत्मनिर्भर भारत’ म्हणजे संरक्षणवाद किंवा जगापासून वेगळे होणारा “अलगवाद’ जोपासणारी भूमिका नाही, उलट हे एक व्यावसायिक प्रगतीचे धोरण असून या धोरणामुळे देशाला आपल्या पारंपरिक शक्तीची ओळख पटणार आहे तसेच त्याचा लाभ करून घेण्याची संधी आहे, असे उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.
देशातील गुणवंत शास्त्रज्ञ आणि कुशल तंत्रज्ञांमुळे भारत आयटीक्षेत्रातील एक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. या योजनेमुळे देशातील आयटी तज्ज्ञांना नवनवेअॅप्स् विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्या ऍप्स्चा उपयोग आपले जीवनमान सुखकर करण्यासाठी होईल, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या कल्पनेनुसार, या आव्हानाची परिणती म्हणून अनेक दर्जेदार “मेड इन इंडिया’ ऍप्स् तयार होतील ज्यातून आत्मनिर्भर अॅप इकोसिस्टीम देखील निर्माण होईल, असे नायडू यांनी सांगितले. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक, श्री श्री रविशंकर, जीएमआर ग्रुपचे अध्यक्ष ग्रांधी मल्लिकार्जुन राव, योगगुरू रामदेव बाबा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रयोगशील तरुणाईची गरज…
“एलिमेंट’ या भारतीय बनावटीच्या अॅपची निर्मिती करण्यासाठी एक हजारपेक्षा अधिक आयटी व्यावसायिकांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. “नव भारताला’ अशाच उत्साही आणि अभिनव कल्पना मांडणाऱ्या प्रयोगशील तरुणाईची गरज आहे. हे अॅप आठ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. लवकरच हे अॅप इतर प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हे अॅप, अनेक परदेशी अॅप्स्ना उत्तम स्वदेशी पर्याय ठरू शकेल, असा विश्वास व्यक्त करत विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, संरक्षण क्षेत्र आणि मानवविकास अशा प्रत्येक क्षेत्रात भारताला आघाडीवर न्यायला हवे, असे उपराष्ट्रपती नायडू यांनी सांगितले.