मांदसौर – फुटलेल्या खिडक्या… तुटलेलेले दरवाजे… भिंतीवर लिहलेले जय श्रीराम… आपल्याच घरात परतायची ग्रामस्थांना वाटत असणारी भीती… हे चित्र आहे, मध्य प्रदेशातील मांदसौर जिल्ह्यातील डोरना या गावातील. पोलिसांनी कोणताही परिणामकारक हस्तक्षेप न केल्याने विश्व हिंदु परिषदेच्या सुमारे पाच हजार कार्यकर्त्यांनी मंगळवारी काढलेल्या मोर्चानंतर “भय इथले संपत नाही’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे ग्रामस्थांनी या रॅली आधी संरक्षण मागण्यासाठी अर्ज दिला होता. अमलवाड ते डोरणा या रॅलीत भगवा ध्वज घेऊन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे, याची माहिती त्यात दिली होती. डोरणातून जाणाऱ्या हिंदू रॅलीला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या औरंगजेबाच्या अवलादींना धडा शिकवू असाही मेसेज सोशल मिडियावर फिरत होता, असेही सांगण्यात आले होते.
त्याचा संदर्भ 25 डिसेंबरला काढलेल्या रॅलीत मशिदीसमोर लाऊडस्पीकरचा आवाज कमी करायला लावण्याशी होता. मात्र रॅलीतील काही जणांनी मशिदीवर चढून भगवा ध्वज फडकावला. मात्र घटनास्थाळावर उपस्थित पोलिसांनी तो उतरवला, असे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.
डोरना हे धार्मिकदृष्ट्या संवेदनशील गाव आहे. तेथे रा. स्व. संघ स्वयंसेवकांची संख्या लक्षणीय आहे.
500 घरांच्या या गावात 82 कुटुंबे मुस्लिम आहेत. या गावात उजव्या गटांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी संकलनाच्या निमित्ताने रॅली काढली. त्यानंतर संघर्षाला सुरवात झाली. मिनारावर चढलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेला वाचा फुटली.
मध्य प्रदेशात दंगलीचा प्रयत्न करण्याची ही काही पहिलीच घटना नाही. अशाच रॅलीत उज्जैन आणि इंदूरमध्येही घटना घडल्या होत्या. डोरणाप्रमाणेच उज्जैनमध्ये रॅलीत आक्षेपार्ह घोषणा दिल्याने स्थानिकांनी दगडफेक केली होती. इंदूरमधील चंदनखेडी गावातही दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली.
समजाकंटकांवर पोलिस कठोर कारवाई करण्यात येईल. ते कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही. अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मध्य प्रदेश हा शांतता प्रिय प्रदेश राहिला पाहिजे, याची आपण काळजी घेऊ.
– शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री