नवी दिल्ली : दिग्गज हॉकीपटू आणि तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे बलबीर सिंह सीनियर यांचे निधन झाले आहे. बलबीर सिंह 95 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. फोर्टिस रुग्णालयाचे डायरेक्टर डॉक्टर अभिजीत सिंह यांनी यांनी याविषयी माहिती दिली. बलबीर सिंह यांनी सोमवारी सकाळी जवळपास 6 वाजून 30 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. बलबीर सिंह सीनियर यांच्या कुटुंबात त्यांची मुलगी सुशबीर आणि 3 मुलं कंवलबीर, करणबीर आणि गुरबीर आहेत.
बलबीर सिंह स्वतंत्र भारतातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक समजले जातात. लागोपाठ 3 वेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय संघात ते होते. 1956मध्ये मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये ते कर्णधार असताना भारताने सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्यावेळी भारतीय संघाने एकूण 38 गोल केले होते. तर विरूद्ध संघाने एकही गोल केला नव्हता. बलबीर सिंह यांचा जन्म 31 डिसेंबर 1923 रोजी पंजाबच्या हरिपूर खालसामध्ये झाला होता. त्यांचा फक्त भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरातील हॉकीच्या सर्वात महान खेळाडूंमध्ये समावेश होतो. बलबीर सिंह भारत स्वातंत्र झाल्यानंतर 1948मध्ये लंडनमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड जिंकणाऱ्या संघाचा भाग होते.
1948 वर्ल्ड कप फायनलमध्ये ब्रिटनच्या विरोधात भारतीय संघाने केलेल्या 4 गोल पैकी 2 गोल बलबीर यांनी केले होते. त्यानंतर बलबीर सिंह सीनिअर त्यांनी लंडन (1948), हेलसिंकी (1952) आणि मेलबर्न (1956) ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये नेदरलँड्स विरोधात 6-1 ने भारताने विजय मिळवला होता. त्या सामन्यात त्यांनी पाच गोल केले असून त्यांच्या नावावर अद्याप हा रेकॉर्ड आहे. 1975 च्या विश्वकप स्पर्धेत विजयी झालेल्या भारतीय हॉकी टीमचे ते मॅनेजर होते.