कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्यावरून त्यांच्या पक्षात (तृणमूल कॉंग्रेस) आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीमुळे आधीच ढवळून निघालेल्या बंगालमधील राजकीय वातावरण ममतांशी संबंधित घटनेमुळे आणखी तापले आहे.
ममता यांनी बुधवारी नंदीग्राममध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सायंकाळी त्यांनी स्वत:वर हल्ला झाल्याचा दावा केला. त्यांना उपचारासाठी कोलकत्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांच्यावरील हल्ल्यावरून तृणमूल आणि भाजपमध्ये जुंपली आहे. ममता यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट होता, असा आरोप तृणमूलकडून करण्यात आला.
भाजप नेत्यांच्या आदेशानुसार निवडणूक आयोग कृती करत आहे. निवडणूक जाहीर झाल्याने ममतांना पुरेशी सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. त्यामुळे हल्ल्याची जबाबदारी आयोगाने स्वीकारावी, अशी आक्रमक भूमिका तृणमूलने मांडली.
तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी ममतांवरील कथित हल्ला म्हणजे सहानुभूतीपोटी मते मिळवण्यासाठीची नौटंकी असावी, अशी शंका उपस्थित केली. नेमके काय घडले ते समजण्यासाठी सीबीआय तपासाची मागणीही त्यांनी केली.