नवी दिल्ली, दि. 14 – पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या पीएम केअर्स फंडातून काही राज्यांना व्हेंटिलेटर्स पुरवण्यात आले पण हे व्हेंटिलेटर्स नादुरुस्त व कुचकामी असल्याच्या तक्रार वाढत आहेत. महाराष्ट्र, पंजाबपाठोपाठ आता राजस्थानातूनही या विषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या असून या प्रकरणी त्या राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी थेट आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून याची तक्रार केली आहे. याच्या चौकशीचीही मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री गहलोत यांनी सांगितले की, आम्हाला या फंडातून 1900 व्हेंटिलेटर्स मिळाले. मात्र ते नीट काम करीत नसल्याची तक्रार अनेक डॉक्टरांनी केली आहे. त्यामुळे अनेक पेशंटच्या जीवाला नाहक धोका निर्माण झाला आहे, असेही गहलोत यांनी म्हटले आहे. या व्हेंटिलेटर्स मध्ये प्रेशर ड्रॉपची समस्या आहे. तसेच यातील पीआयओ 2 मध्येही काही त्रुटी आहेत. सलग दोन तास चालल्यानंतर हे व्हेंटिलेटर्स बंद पडत आहेत. थोड्याशा वापरानंतर अनेक व्हेंटिलेटर्समधील ऑक्सिजन सेन्सर आणि कॉम्प्रेसर फेल होत आहेत. याप्रकरणी गहलोत यांनी केंद्र सरकारला दोन पत्रे लिहिली असून त्याच्या चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, या व्हेंटिलेटर्समध्ये मोठ्या स्वरूपाचा घोटाळा झाला आहे आणि त्याच्या सखोल चौकशीची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षानेही केली आहे. या पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की हे व्हेंटिलेटर्स तज्ज्ञांनाही दुरुस्त होण्याच्या पलीकडे गेले आहेत.
औरंगाबाद आणि नाशिकला पुरवण्यात आलेले व्हेंटिलेटर्स बंद पडले असून त्याची राजस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या व्हेंटिलेटर्सचे सुटे भागही संबंधित कंपनीकडून उपलब्ध होत नसल्याने ही उपकरणे अनेक ठिकाणी प्रत्यक्ष वापरातच येऊ शकलेली नाहीत. अत्यंत तकलादू आणि फालतू कंपन्यांना ही व्हेंटिलेटर्स पुरवण्यामागे भ्रष्टाचाराचे मुख्य कारण असले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.