नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
पिंपरी – लॉकडाउन शिथील झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा सुरु झालेले वाहनांच्या तोडफोडीचे सत्र अद्यापही कायम आहे. रविवारी (दि. 31) पहाटेच्या सुमारास नेहरूनगर, पिंपरी येथे अज्ञात व्यक्तीने पाच वाहनांची तोडफोड केली. यामुळे नेहरूनगर भागातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरूनगर परिसरातील पाच वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. ही घटना रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वाहनांच्या काचा फोडताना नागरिकांनी कोणालाही पाहिलेले नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी वाहनांच्या तोडफोडीची घटना घडली त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत.
शहरातील वाहनांच्या तोडफोडीचे सत्र अद्यापही कायम आहे. पोलिसांनी चौकशीसाठी गाडी थांबविल्याच्या कारणावरून एकाने पोलिसांच्याच वाहनांची तोडफोड केली होती. ही घटना बोपखेल येथे १० मे रोजी घडली. त्यानंतर १८ मे रोजी चिंचवडच्या बिजलीनगर भागात दहशत निर्माण करण्यासाठी एका टोळक्याने १३ वाहनांची तोडफोड केली होती.
पिंपळे सौदागर येथील पोलीस चौकीच्या पासून हाकेच्या अंतरावर चाहोती जणांनी मोटार चालकाला मारहाण करीत परिसरातील काही वाहनांची तोडफोड केली होती. ही घटना २१ मे रोजी घडली. त्यानंतर घरकुल, चिखली येथे आक्या बॉण्ड टोळीतील सदस्यांचा शुक्रवारी (दि. २९) रात्री खून झाला. या टोळीच्या सदस्यांनी शनिवारी (दि.३०) आरोपी राहत असलेल्या परिसरातील वाहनांची तोडफोड केली होती.
गेल्या दोन वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात सुरू झालेले वाहनांच्या तोडफोडीचे सत्र अद्यापही कायम आहे. प्रत्येक महिन्यात वाहनांच्या तोडफोडीच्या किमान दोन घटना तर घडत आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. गुन्हेगारांवर वचक बसेल अशी कारवाई पोलिसांनी करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.