नवी दिल्ली – वाहन क्षेत्रातील परिस्थिती पुर्ववत होऊ लागली आहे. फेब्रुवारीत वाहन कंपन्यांच्या विक्रीत वाढ नोंदली गेली. भारतातील सर्वात मोठी वाहन कंपनी असलेल्या मारुती सुझुकी कंपनीच्या वाहन विक्रीत 11.8 टक्क्यांची वाढ होऊन या कंपनीने 1,64,469 युनिट्सची विक्री केली.
बजाज ऑटोच्या विक्रीत 6 टक्क्यांची वाढ होऊन विक्री 3,75,017 युनिट इतकी झाली.
एस्कॉर्ट ट्रॅक्टरच्या विक्रीत 30.6 टक्के वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात टोयोटोची विक्री 36 टक्क्यांनी वाढली आहे. नव्यानेच भारतीय बाजारपेठेत आलेल्या एमजी मोटारींची विक्री फेब्रुवारी महिन्यात तीन पटींनी वाढली.
अशोक लेलॅंड व्यावसायिक वाहन निर्माता कंपनीच्या विक्रीत फेब्रुवारी महिन्यामध्ये 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील दुसऱ्या कंपन्यांच्या दुसऱ्या क्रमांकाची कार कंपनी असलेल्या ह्युंदाई कंपनीच्या विक्रीमध्ये फेब्रुवारी महिन्यात 26 टक्के इतकी वाढ झाली आहे.
निस्सान कंपनीला फेब्रुवारी महिन्यात विक्री वाढविण्यात चांगलेच यश मिळाले असून या कंपनीच्या वाहन विक्रीत चार पटीने वाढ झाली आहे. मात्र महिंद्रा कंपनीच्या वाहन विक्रीत फेब्रुवारी महिन्यामध्ये 11 टक्क्यांची घट नोंदली गेली. असे असले तरी आगामी काळामध्ये विक्री वाढत जाण्याची शक्यता असल्याचे महिंद्रा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नाकरा यांनी सांगितले.
टीव्हीएस मोटर्स कंपनीच्या फेब्रुवारी महिन्यातील विक्रीत 18 टक्के वाढ झाली आहे. टाटा कंपनीला आपल्या वाहन विक्रीत वाढ करण्यात यश मिळाले आहे. या कंपनीने बरीच नवी उत्पादने गेल्या काही दिवसात सादर केली आहेत. फेब्रुवारी महिन्यात टाटा मोटर्सची विक्री 51 टक्क्यांनी वाढली.