पावसामुळे मंडईकडे ग्राहकांची पाठ : सकाळी वाढलेला दर सायंकाळी घसरला
पिंपरी – संततधार पडणाऱ्या पावसामुळे पिंपरी भाजी मंडईत ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. भाजीपाल्यांना मागणी नसूनही, शेवगा, गाजर, गवाराचे दर वाढले. पावसामुळे भाजी मंडईत येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली होती. पावसामुळे पालेभाज्या खराब होत असल्याने सकाळपासून वाढलेला दर सायंकाळपर्यंत घसरला होता. तर, काही पालेभाज्यांचा दर दुप्पटीने वाढल्याने नागरिकांना त्यासाठी जादा पैसे मोजावे लागले.
गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या रिपरिप पावसामुळे भाजी मंडईत भाजीपाल्याची आवक कमी झाली आणि यामुळे भाजीपाल्यांचे दरात वाढ झाली आहे. त्यात, पावसामुळे आणि भाजी मंडईत असलेल्या ठिकठिकाणी चिखलामुळे ग्राहक खरेदीसाठी आलेच नाहीत. मात्र, ग्राहक नसूनही भाज्यांचे दर वाढलेले होते. गाजर, शेवगा, वांगी आणि गवाराच्या दरात मोठया प्रमाणात वाढ झाली. शेवगाचा भाव शंभरपर्यंत गेला होता. काकडी, श्रावणी घेवडा, हिरव्या मिरचीचे दर गडगडले होते. विक्रेत्यांनी भाजीपाला जादा किंमतीत खरेदी केला होता. ग्राहकांची गर्दी होईल, या दृष्टीने अनेकांनी भाजीपाला रचून ठेवला होता. मात्र, पावसामुळे ग्राहक मंडईत फिरकलेच नाहीत. त्यामुळे नुकसान सहन करुन मिळेल त्या किंमतीत भाजीपाला विकावा लागला.
परिणामी, सकाळी वधारलेला भाव सायंकाळी मात्र खाली येत आहे. तर, पावसामुळे आवक मंदावल्याने कोथिंबीर, शेपूचे दर कडाडले होते. गेल्या आठवडयात 10 ते 15 रुपयांस विकली जाणारी कोथिंबीर तीस रुपयापर्यंत आली होती. त्याचप्रमाणे मेथीचे दरही 25 रुपयापर्यंत गेले होते. इतरही पालेभाज्यामध्ये 5 ते 10 रुपयांची वाढ झाली होती. पावसामुळे पालेभाज्या लवकर खराब होत असल्याने अनेक विक्रेत्यांनी नुकसान सहन करुन भाज्यांची विक्री केली. त्यामुळे आठवडाभराची खरेदीसाठी आलेल्या अनेक ग्राहकांनी जेमतेम भाजी खरेदी केली.
विक्रीचे दर पुढीलप्रमाणे
बटाटे : 15, कांदे : 40 ते 45, टोमॅटो : 35 ते 40 , गवार : 60 ते 70, दोडका : 40 ते 50, घोसाळी : 30 ते 40, लसूण : 200, आले : 90, भेंडी : 40 ते 50 , वांगी : 60 ते 70, कोबी : 25 ते 30, फ्लॉवर : 60 ते 70, शेवगा : 100, हिरवी मिरची : 30 ते 40, शिमला मिरची : 40 ते 50, पडवळ : 50, दुधी भोपळा : 40, लाल भोपळा : 25 ते 30, काकडी : 20 ते 30, चवळी : 50, काळा घेवडा : 60 ते 70, तोंडली : 50, गाजर : 80 ते 90, वाल : 90, राजमा : 70, मटार : 80 ते 90, कारली : 40, पावटा : 30 ते 40, श्रावणी घेवडा : 50 ते 60, लिंबू : 400 (शेकडा). तर, कोथिंबीर : 30, मेंथी : 25, शेपू : 15, पालक : 20, मुळा : 15.