नगर – अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नगर-कल्याण रस्त्यावर सोशल डिस्टन्सचे नियम पायदळी तुडवीत गेल्या काही दिवसांपासून भाजीबाजार भरवत जात आहे. नेप्तीनाका चौकापासून सीना नदीच्या पुलापर्यंत दररोज पहाटे चक्काजाम होईपर्यंत भाजीविक्रेते आणि खरेदीदार रस्त्यावर गर्दी करत आहेत.
नगरमधील मार्केटयार्डमध्ये आडते, शेतकरी, किरकोळ विक्रीसाठी भाजी खरेदी करणारे भाजीविक्रेते व सामान्य ग्राहकांनी सोशल डिस्टन्सचा नियम पायदळी तुडविल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मार्केटयार्ड बंदच करण्याचे काढले. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांनाही गर्दी न करण्याबाबत तंबी दिली. तथापि, आता अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नगर-कल्याण रस्त्यावर साधारण दीड किलोमीटर अंतरावर दररोज पहाटे साडेचारपासून भाजीविक्रेते रस्त्यावर ठाण मांडत असल्याचे भीषण वास्तव्य आज समोर आले आहे.
लॉकडाऊनच्या नियमांची रात्रंदिवस काटेकोर अंमलबजावणी करणारे पोलिस दल सकाळी थोडे उशिरा या भागात पोचल्याने या गर्दीला मोकळीक मिळते. सोशल डिस्टनच्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी सकाळी पोलिस दल पोचते. तोपर्यंत या भागात गर्दीचा उच्चांक करत स्थानिक नागरीक अगदीच बिनधास्तपणे भाजी खरेदी करत असल्याचे आज समोर आले.
भाजीसह पहाटे दूध विक्रीसाठीही काही व्यावसायिक बाहेर पडतात. या रस्त्याने येणाऱ्या दूध विक्रेत्यांना रस्त्यातील या गर्दीतून वाट काढत जावे लागते. त्यामुळे आता पहाटेपासून या भागात बंदोबस्त करण्याची स्थिती ओढवली असल्याची भावना अन्य स्थानिक नागरीक व्यक्त करत आहेत.