परवाना नसलेल्यांची संख्या लॉकडाऊनच्या काळात वाढली; महापालिकेचे दुर्लक्ष
कोथरूड – लॉकडाऊनमुळे उपनगरांत भाजी विक्रीचा व्यावसाय फोफावला आहे. सोसायटी, कॉलनीत कोणीही भाजी विक्रीसाठी यावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. उपनगरात विविध ठिकाणी भाजी विक्रेत्यांनी अनधिकृत बस्तान बसवविल्याने करोनाच्या संकटात अशा विक्रेत्यांची अतिक्रमणं वाढत आहेत, महापालिकेने यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कोथरूड येथील एमआयटी कॉलेज परिसरात भाजीची काही दुकाने कायमस्वरूपी आहेत; परंतु त्यानंतरही 8 ते 10 ठिकाणी भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण करून बस्तान बसवले आहे. येथे भाजीविक्रेते कोठून आले, ते भाजी कोठून घेऊन येतात, याबाबत काहीच माहिती नाही. याबाबत सुरुवातीला काही दिवस नागरिकांनी विरोध केला नाही; परंतु आता हे भाजी विक्रेते सर्रास येथे बसत आहेत. सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत येथे भाजी विक्री सुरू असते. यावेळी सुरक्षिततेचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. शहरातील अनेक ठिकाणच्या भाजी मंडई टप्प्याटप्प्याने सुरू केल्या आहेत. काही दिवसांत अशा विक्रेत्यांचे प्रमाण कमी होईल.
त्यानंतरही भाजी विक्रेते अनधिकृतपणे व्यवसाय करताना दिसले तर पालिकेतर्फे कारवाई केली जाईल, असे अतिक्रमण हटाव विभागप्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.