पुणे – लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भाज्यांना मागणी वाढली आहे. महात्मा फुले मंडईसह विविध किरकोळ बाजारात, विक्रेत्यांकडे खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. परिणामी, किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव कडाडले आहेत. नेहमीच्या तुलनेत भावात तिप्पट ते चौपट वाढ झाल्याची पहायला मिळाले. 100 ते 200 रुपये किलो भावाने भाज्यांची विक्री होत आहे. कोथिंबिरीच्या जुडीला 30 ते 40 रुपये मोजावे लागत असून, इतर पालेभाज्यांच्या जुड्यांची चढ्या भावाने विक्री होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा मुहूर्त साधत पुणेकरांची लूट सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.
शहरात दि. 13 पासून लॉकडाऊन होणार असल्याने मागील दोन दिवसांपासून किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव कडाडले आहेत. विशेषत: रविवारी सुट्टी असल्याने भाज्या खरेदीसाठी पुणेकरांनी गर्दी केली. दहा दिवस पुरेल एवढा भाजीपाला घेण्याकडे नागरिकांचा कल आहे. सायंकाळपर्यंत या रांगा कायम होत्या. घेवडा, मटार यांची प्रत्येकी 200 किलो भावाने विक्री होत आहे. टोमॅटो, भेंडी, हिरवी मिरची, फ्लॉवरला 100 ते 120 रुपये, दुधी भोपळा-50 रुपये, चुका जुडीसाठी 20 ते 30 रुपये भाव मिळत आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भाज्यांना एकदमच मागणी वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात भाव वाढले. यामुळे किरकोळ बाजारातदेखील भाव तेजीत आहेत.
– प्रकाश ढमढेरे, कार्याध्यक्ष, किरकोळ भाजीविक्रेते संघटना