सातारा -सातारा शहरातील भाजी मंडई शुक्रवारपासून पुन्हा सुरू करण्यात आल्या असून विक्रेत्यांना लॉकडाऊनमधील सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या आधी पालिकेने मंडईत जंतुनाशक फवारणी केली.
लॉकडाऊनचे निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने सातारा शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहे. सामूहिक संसर्गाच्या भीतीमुळे शहरातील भाजी मंडई जवळपास चार महिने बंद ठेवण्यात आल्या होत्या.
आता राजवाडा, सदाशिव पेठ, पोवई नाका व सदरबझार येथील भाजी मंडई शुक्रवारपासून सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सशर्त परवानगी दिली. त्यानंतर विक्रेत्यांनी मंडईत कट्ट्यांवर बसून सकाळी आठ वाजल्यापासून भाजी विक्री सुरू केली. भवानी पेठेतील मंडईत गर्दी टाळण्यासाठी 15 विक्रेत्यांनाच परवानगी देण्यात आली. अतिक्रमण व मंडई विभागप्रमुख प्रशांत निकम यांच्या पुढाकारामुळे मंडईत जंतुनाशक फवारणी व स्वच्छता करण्यात आली.
मंडईच्या नियम अटी
प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक आहे. विक्रेत्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे. विक्रेत्यांनी सॅनिटायझर ठेवावे, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत, पाचपेक्षा जास्त व्यक्ती विक्रेत्यासमोर आढळल्यास दंड आकारण्यात येईल. विक्रेत्यांनी सुरक्षिततेसाठी डिजिटल थर्मामीटर ठेवणे आवश्यक आहे.
शरीराचे तापमान 37 अंश व पल्स ऑक्सीमीटरचे रीडिंग 94 पेक्षा कमी आढळल्यास तात्काळ कोव्हिड कक्षात नोंद करण्याची जवाबदारी विक्रेत्यांची असेल, अशी नियमावली करण्यात आली आहे. या नियमांचे काटेकोर पालन न झाल्यास मंडई लगेचच बंद करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.