नगर – नवनागापूर, एमआयडीसी हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना मागे सरकविण्यासाठी व परिसराची स्वच्छता करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्याची मागणी भाजपा अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा शारदा गायकवाड यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या मागणीची दखल न घेतल्यास दि. 13 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. एमआयडीसी येथील सनफार्मा चौक ते सह्याद्री चौक तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनपर्यंत रस्त्याच्या कडेला भाजी व फळ तसेच मटण- मच्छी बाजार भरत आहे. मात्र प्रत्येक विक्रेता जास्त ग्राहक आपल्यापर्यंत कसे पोहचतील, या अपेक्षेने थेट रस्त्यावरच्या जागेची निवड करून तेथे भाजीपाला विक्री व टपऱ्यांचे अतिक्रमण करुन दुकाने थाटण्यात आली आहे.
यामुळे वाहतूकीस कोंडी निर्माण होऊन अपघातांना निमंत्रण मिळत आहे. तर अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. या संदर्भात एमआयडीसी, पोलीस व जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.