नागठाणे – सद्यस्थितीत भाजीपाल्याचे कोसळलेले दर, भाजीपाला रोपांची अनुपलब्धता यासह अन्य कारणांमुळे राज्यात नव्याने होणारी भाजीपाला लागवड खोळंबली आहे. बाजारपेठा पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत. महत्वाच्या शहरांतील लॉकडाऊन कायम आहे. परिणामी भाजीपाल्याची मागणी अजूनही वाढलेली नाही. याचा फटका शेतकऱ्याला बसला आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह राज्यांतील इतर भाजीपाला पट्ट्यातही अशीच परिस्थिती आहे. महत्वाच्या बाजारपेठा एक तर बंद किंवा कमी क्षमतेने सुरु असल्याने मालाचा उठाव होईनासा झाला आहे. यामुळे या बाजारपेठांत दररोज शेकडो वाहने पाठविणाऱ्या गावांमध्येही गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णपणे शांतता आहे. बाजारपेठा कधी बंद, कधी सुरु या खेळात भाजीपाला उत्पादक संघांची दैना उडत आहे. याचा सरसकट परिणाम स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांच्या नियोजनावर होत असल्याचे विदारक चित्र भाजीपाला पट्ट्यात कायम आहे. सगळ्याच गोष्टी नकारात्मक घडत असल्याने भाजीपाला पट्ट्यात नव्या लागवडी खोळंबल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातून राज्यभर भाजीपाला लागवडीसाठी रोपे जातात. पण करोना संकटामुळे भाजीपाल्याची रोपे तयार करणे अडचणीचे बनले आहे. रोपे तयार करण्यासाठी कच्चा माल वेळेत उपलब्ध होत नसल्याने रोपवाटिका चालकांनाही शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात रोपे तयार करणे कठीण होऊन बसले आहे. लॉकडाऊनचा फटका संपूर्ण देशाला बसला आहे, यामध्ये बळीराजाही भरडला गेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी झेंडू, टोमॅटो, कलिंगड, फ्लॉवर, कोबी, मिरची, पपई, वांगी, खरबूज आदी रोपे नर्सरीवाल्यांकडे थोडीशी रक्कम देऊन आरक्षित केली होती.
परंतु; करोनामुळे पुढे पिकाला बाजारभाव मिळेल की नाही, या भीतीमुळे बुकिंग केलेल्या रोपांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने नर्सरीमध्ये रोपे पडून आहेत. त्यामुळे ही रोपे फेकून देण्याची वेळ नर्सरीचालकांवर आली आहे. सध्या मार्केटच बंद असल्यामुळे नवीन लागवड करण्यास कोणी धजावत नाही. आता पुढची स्थिती काय असेल याचा अंदाज येत नसल्याने शेतकरी रोपे नेण्यास तयार नाहीत. त्यामुळे नर्सरीवालेही आर्थिक अडचणीत आले आहेत.
खते,औषधांची होतेय कृत्रिम दरवाढ
खते औषधे मिळवताना अडचणी भविष्यात दर मिळेल या अपेक्षेने गेल्या महिनाभरात काही शेतकऱ्यांनी पुन्हा भाजीपाला लागवड केली. परंतु; ज्या प्रमाणात औषधे, खते मिळायला हवीत तितक्या प्रमाणात व वेळेत उपलब्धता होत नसल्याने भाजीपाल्याचे व्यवस्थापन करणे अशक्य बनत असल्याने अनेकांनी तयार केलले प्लॉट तसेच ठेवून दिले आहेत. आवश्यक ती रोपे, खते, बियाणाची उपलब्धता करण्याचे मोठे आव्हान आमच्यापुढे असल्याचे भाजीपाला उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी औषधांच्या किंमतीमध्येही कृत्रिम वाढ करण्यात आली आहे. याचा फटकाही शेतकऱ्याला बसू लागला आहे.