पुणे – गाळ्यापासून 15 फुटांच्या पुढे शेतमालाची विक्री करणे, रहदारीस अडथळा करणारी वाहने आणि मास्क न वापरणाऱ्यांवर 1 नोव्हेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत मार्केट यार्डातील तरकारी विभागात कारवाई करण्यात आली.
चार गटात मिळून 1 लाख 47 हजार 828 रुपयांचा दंड वसूल केला. विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटप्रमुख दादासाहेब वारघडे, दीपक थोपटे, दीपक टांगडे आणि आशिष राऊत यांनी ही कारवाई केली.
बाजाराला शिस्त लागावी, यासाठी बाजार समिती प्रशानकडून मोहिम राबविण्यात आली. गट क्रमांक 1 मधून गटप्रमुख दादासाहेब वारघडे यांनी 54 हजार 752 रुपये, गट क्रमांक 2 मधून गटप्रमुख दीपक थोपटे यांनी 16 हजार 992, गटक्रमांक 3 मधून दीपक टांगडे यांनी 14 हजार 868 आणि गटक्रमांक चारमधून आशिष राऊत यांनी 61 हजार 216 रुपयांचा दंड वसूल केला.
गाळ्यापासून 15 फुटाच्या बाहेर फळे विक्री करण्यास विक्रेत्यांना मज्जाव आहे. तरी काही विक्रेते या नियमाला बगल देताना दिसून आले. त्यांच्यावर आणि बेशिस्त पार्किंग करून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. याशिवाय, करोना पार्श्वभूमीवर मास्क न घालता बाजार आवारात फिरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत असल्याचे विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर यांनी सांगितले.