लोणंद – सातारा व पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे धरण भरण्याच्या मार्गावर आहे.
धरणात 98.48 टक्के पाणीसाठा झाल्याने बुधवारी दुपारी चार वाजता धरणाचा पाच नंबरचा दरवाजा एक फुटाने उचलून आणि विद्युत गृहातून चार हजार 600 क्युसेक पाणी नीरा नदीपात्रात सोडण्यात येत असल्याची माहिती धरण अभियंता विजय नलवडे यांनी दिली.
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नीरा खोऱ्यामध्ये असलेली भाटघर (70.62 टक्के), नीरा-देवघर (58.69 टक्के), गुंजवणी (87.20 टक्के) ही सर्व धरणे गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे भरण्याच्या मार्गावर आहेत.
वीर धरण 98.48 टक्के भरले आहे. वीर धरणातून बुधवारी दुपारी चार वाजल्यापासून पाच नंबरचा दरवाजा एक फुटाने वर उचलून पाण्याचा विसर्ग नीरा नदीत करण्यास सुरुवात झाली होती. विद्युतगृहातूनही पाणी आधीपासून सोडले जात आहे. धरणातून बुधवारी रात्री साडे आठ वाजल्यापासून एकूण चार हजार 600 क्युसेक विसर्ग होत असल्याने धरण व्यवस्थापनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.