– रोहिदास होले
सदाहरित वासोटा… शिवकालीन वारसा असलेल्या सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला म्हणजेच व्याघ्रगड. सह्याद्रीच्या खोर्यात भटकंती करणार्या दुर्गयात्रींसाठी अनुभूती देणारा ठरतोय. 4 हजार 267 फूट उंचावरील या व्याघ्रगडाची राजगुरुनगरमधील ढुम्या डोंगर गिरीभ्रमण मंडळाच्या पुढाकाराने माझ्यासह 16 सदस्यांनी रविवारी (दि. 8 मार्च) भ्रमंती केली. ‘बोटिंग’ आणि ‘ट्रेकिंग’ अशा दुहेरी सफरीचा थरार प्रत्येकानेच अनुभवावा असाच आहे.
तापोळा मुक्कामी असलेला आम्हा दुर्गप्रेमींची कोयना जलाशयातून सकाळी साडेनऊ वाजता ‘वासोटा सफर’ मार्गस्थ झाली. नजर जाईल तिथंपर्यंत पाणी आणि जलाशयाला वेढा घातलेला हिरवेगार डोंगर. हिरव्या झाडीत मोजकीच बैठी टुमदार घरं. जंगलाच्या दाटीत पाणगळ दिसत असली तरी फुलणारं एखादं झाडही मनाला ‘चैत्र पालवी’सारखं वाटायचं. निळ्याभोर आकाशातील ढग आम्हाला जणू ‘शुभ सकाळ’ म्हणतात की काय असे भासायचे. बारकाईने पाहिल्यानंतर प्रत्येक झाडं आणि डोंगर आपलं वेगळं अस्तित्त्व पटवून देत होतं. कोणी डौलदार, कोण झुपकेदार, एखादा निष्पर्ण, कोण फुलांनी बहरलेला. सारं कसं आगळं वेगळं होतं.
एवढंच कशाला तर डोंगरावरील पवनचक्क्यांची फिरणारी पाती हळूवारपणे आम्हाला ‘टाटा’ करीत शुभेच्छा देतात की काय असे वाटायचं. उनं-सावलीचा खेळ, मुक्तसंचार करणारे बगळे, पक्षी आपल्या विश्वात रमलेले दिसले. बोटिंगचा प्रवासातील आणखी एक नोंद म्हणजे गावच्या वेशी, स्मशानभूमी, झाडीत लपलेली लोकवस्ती, मंदिर आणि त्यावर फडकणार्या भागवत धर्माच्या पाताका सगळंच अल्हाददायक वाटे. कमाल म्हणजे पाणी ओसल्यानंतर वस्ती करून राहणारी डौलदार झाडं सार्यांचे लक्ष्य वेधत. तर दुसरीकडे निष्पर्ण झाडांचे सांगाडे ‘मरावे परी कीर्ती रुपी उरावे’, असेच काहीसं म्हणत असावीत म्हणून प्रत्येक हौशी ट्रेकर, पर्यटक त्यांचे मृत असलेले परंतु जिवंतरूप न्याहाळत धन्य होतो. डोंगररांगांना वळसा घालून आमची बोट पुढे-पुढे सरकल्यानंतर वासोटा नजरेच्या टप्प्यात आला आणि दुर्गयात्रींची आनंद द्विगुणीत झाला.
दीड-पावणे दोन तासांच्या ‘बोटिंग’नंतर आम्ही सारे पायथ्याशी पोहोचलो. आम्ही पोहचण्यापूर्वीच बोट गर्दी करून होत्या. त्या बोटिंगवर भगव्या रंगाच्या झेंड्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वरूढ छबी प्रत्येकालाच नवी ऊर्जा देत होती. बामणोली वनविभागाच्या ‘सह्याद्री व्याघ्र राखीव’ अखत्यारितील वासोटा सफरीला साधारणत: 11.05 वाजता सुरुवात झाली. वन्य प्राण्यांपासून सावध रहा, वणवा, प्लॅस्टिक बंदी अशा पर्यावरणाचा समतोल राखवा हे दर्शविणारे सूचना फलक खर्या अर्थाने पर्यटक, दुर्गप्रेमींचे वनसंवर्धनाची साद घालत होते. काही अंतर पायपीट केल्यानंतर पावसाळ्यात डोंगर उतारावरून येणार्या जलवाटा दिसल्या. वाहत्या नसल्या म्हणून काय झालं. त्यातील झर्यांमधील थंडगार पाणी जिवंतपणाची आरोळी देत होते. या झर्याच्या बाजुला गणपती बाप्पा आणि शक्तीची देवता म्हणजेच मारूतीचे मंदिर. तिथे माथा टेकविल्यानंतर खर्या अर्थाने आम्ही हनुमान उडी घेत वासोटा किल्ला चढणीचा ‘श्रीगणेशा’ केला.
घनदाट जंगल, वेडीवाकडी वृक्षवेली, उंचीसाठी स्पर्धा करणारे भलेमोठे वृक्ष, कोरलेली दगड-गोट्यांनी पायवाट अन् कीटकांची अखंड किर्रर्रऽऽऽऽऽऽ, किर्रर्रऽऽऽऽऽऽ हा वेगळाच ‘ट्रेक’ अनुभवायला मिळाला. दुपारी साडेबाराच्या सुमारास आमची स्वारी किल्ल्यावर पोहोचली आणि मनाला मिळणारे समाधान, तो आनंद सांगता येत नाही, तो अनुभवायला हवा, हे ही तितकच खरं आहे. सह्याद्री डोंगर रांगाचे आक्राळ-विक्राळ रूप, शिवमंदिर, झाडाझुडपात दगडी बांधकामे, थंडगार पाण्याची बारव, भग्नावस्थेतील दगडाचा घाणा, त्यालगतची खोल विहिर आणि कड्यावरून दिसणारी नागेश्वर गुहा असे सारं काही कॅमेर्यात टिपले अन् साठवता येईल तेव्हढं डोळ्यात साठवलं. पोटपुजा आटोल्यानंतर लागलीच दुपारी दोनच्या सुमारास परतीचा प्रवासाला निघालो. अंदाजे सव्वातासात पायथा गाठला. आणि पुन्हा बोट सफर सुरू झाली. ‘आता इथ परत कधी’ असे मनोमन विचारत ‘वासोट्याला बाय’ म्हटलं…