कांदा, बटाटा व फळ बाजार २१ पासून सुरू मात्र मर्यादित आवक
जुन्नर(प्रतिनिधी) – वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजीपाला धान्य व मसाला बाजारातील व्यापार सोमवार (दि. १८) पासून सुरू होणार आहेत. मात्र याकरिता धान्याची ३०० वाहने, मसाल्याची २०० तर भाजीपाल्याच्या १५० वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. तर येत्या २१ तारखेपासून कांदा, बटाटा व फळ बाजार सुरू करण्यात येणार आहे. पणन खात्याच्या सूचनेनुसार आयोजित मान्यवरांच्या बैठकीत वरील निर्णय झाल्याची माहिती संचालक संजय पानसरे यांनी दिली आहे.
बाजार समितीच्या आवारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची थर्मलगन द्वारे तपासणी करण्यात येणार आहे. तसेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रणाम मोजण्यासाठी प्लस ऑक्सिमिटर तपासणी केल्याशिवाय प्रवेश मिळणार नसल्याचे समितीने सांगितले आहे.
याव्यतिरिक्त सर्वांना मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले असून समितीच्या आवारातील स्वच्छता व फवारणी वेळोवेळी सुरू राहणार आहे. या बाजारात जुन्नर व आंबेगाव तालुक्यातून भाजीपाला व फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ११ तारखेपासून ह्या बाजारातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.