पुणे – “मी साहेबांच्या राजमार्गावरचा माणूस असून, मी राजमार्गावरच आहे त्यामुळे उशिरा का होईना मी आलो’ अशी प्रतिक्रिया मनसे नेते वसंत मोरे यांनी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. त्यापुर्वी राज ठाकरे पुण्यात दाखल झाले होते.
पुण्यातील त्यांच्या राजमहाल निवासस्थानातून ते औरंगाबादला आज सकाळी रवाना झाले आहेत. यावेळी राज ठाकरे यांच्या राजमहालाबाहेर मनसेच्या पुणे-मुंबईतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. 100 ते 200 पुरोहितांच्या उपस्थितीत मोठा धार्मिक विधी सुद्धा पार पाडण्यात आला. आणि नंतर राज ठाकरे औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले.
दरम्यान, या कार्यमाला पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे कुठेच दिसले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मोरे यांनी मनसे सोडली अशा चर्चांना उधान आले. मात्र, आता सर्व अफवांवर स्वतः वसंत मोरे यांनी उत्तर दिल आहे.
वसंत मोरे म्हणाले की.., ‘औरंगाबादला माझे नियोजन उद्या सकाळचे आहे. पण अचानक मला मेसेज आला, की आजच जायचे आहे. यात गैरसमज नकोत म्हणून याठिकाणी आल्याचे मोरे म्हणाले. तसेच, “मी साहेबांच्या राजमार्गावरचा माणूस असून, मी राजमार्गावरच आहे त्यामुळे उशिरा का होईना मी आलो’. असं ते म्हणाले.