ग्वाल्हेर – भारतीय जनता पार्टीचे खासदार वरूण गांधी विविध विषयांवर सातत्याने आपले मत व्यक्त करत भाष्य करत असतात. अलिकडच्या काळात आपल्या पक्षाच्याच विरोधात जाणाऱ्या भूमिका त्या मांडत असतात. याच मुद्द्यावर बोलताना केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. वरूण यांना विविध विषयांवर मत प्रदर्शित करण्याची आवडच आहे, असे तोमर यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेनुसार लष्करात दाखल होणाऱ्या अग्निवीरांना जर चार वर्षांची मुदत संपल्यानंतर पेन्शन दिले जाणार नसेल तर लोकप्रतिनिधींनाही पेन्शन देण्याची काय गरज आहे, असे विधान गेल्या आठवड्यात वरूण गांधी यांनी केले होते.
अग्निवीरांना पेन्शन मिळावे याकरता आपण सगळे आमदार आणि खासदार आपल्या पेन्शनचा त्याग करू शकतो का, असा सवालही वरूण यांनी गेल्या आठवड्यात केला होता. त्यावरून तोमर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. तेव्हा ते म्हणाले की वरूण गांधी यांचे हे व्यक्तीगत मत आहे. त्यांना दररोज प्रत्येक विषयावर असे व्यक्तीगत मत मांडण्याची आवड आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील घडामोडींबाबत बोलताना ते म्हणाले की, त्या प्रकरणाशी भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही. तसेच मध्य प्रदेशात हाती घेतलेल्या विकासकामांमुळे या राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.