निर्माता मुराद खेतानी यांचा 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या “नमक हलाल’ चित्रपट पुन्हा साकारण्याचे राइट्स खरेदी करण्यात आले आहेत. दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, स्मिता पाटील, शशि कपूर आणि परवीन बॉबी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटातील गाणीही खूप गाजली होती.
या चित्रपटात अमिताभ बच्चनने ऍक्शनसह कॉमेडीही केली होती. ही भूमिका चाहत्यांना खूपच आवडली होती. मुराद खेतानी यांनी स्पष्ट केले की, “नमक हलाल’ चित्रपटाची स्क्रिप्ट ही आजच्या अंदाजात लिहिण्यात येत आहे. कथेचा मुलभाव तोच राहणार आहे, परंतु आजच्या चाहत्यांना आवडेल असे त्यात बदल करण्यात येणार आहेत.
सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू असून यानंतर दिग्दर्शक आणि कलाकारांबाबत विचार करण्यात येईल. परंतु या चित्रपटासाठी हीरो आणि दिग्दर्शक निश्चित झाल्याचे समजते. “नमक हलाल’च्या रिमेकमध्ये अमिताभची भूमिका वरुण धवन साकारणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
तसेच दिग्दर्शकाची जबाबदारी त्याचे वडील डेविड धवन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यामुळे “नमक हलाल’च्या रीमेकची चाहत्यांना आतापासूनच उत्सुकता लागली आहे.