मुंबई – सत्ताधारी भाजपच्या 116 खासदारांविरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी 87 खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी माध्यमांसमोर मांडली. या पत्रकार परिषदेला पुणे शहर उपाध्यक्ष रुपाली ठोंबरेदेखील उपस्थित होत्या.
मोदी सरकारच्या मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात देशात महिला अत्याचार, बलात्कार, विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे. यात महिला अत्याचार करणाऱ्या आरोपींमध्ये भाजप खासदार, आमदार व नेत्यांची यादी मोठी आहे, असा थेट आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेसाठी मोदी सरकारने 401 कोटींची जाहीरातबाजी केली होती. त्याप्रमाणेच मोदी सरकार त्यांच्या पक्षातील नेत्यांनी केलेल्या अत्याचारांची माहितीही जाहीरातीद्वारे प्रसिद्ध करणार का, असा सवाल त्यांनी मोदी सरकारला केला आहे.
विद्या चव्हाण यांनी या भाजप नेत्यांची सविस्तर यादीच पत्रकार परिषदेत वाचून दाखवली. हे केवळ हिमनगाचे टोक आहे. भाजप सत्तेत आहे या धाकाने अनेक महिला गप्प असतील अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. यावेळी गोव्यात गैरपद्धतीने सुरु केलेला बार व रेस्टॉरंट प्रकरणात स्मृती ईराणी खोटे बोलत आहेत, असा आरोप त्यांनी केला. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नेत्यांवर काय कारवाई झाली व काय शिक्षा झाली याचा खुलासा भाजपने करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, सत्तेत आल्यापासून आपला तो बाब्या आणि लोकांचं ते कार्ट अशी भाजपची भूमिका असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे उपाध्यक्ष रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला. एखाद्या महिलेवर अन्याय झाला नसेल तरी त्याचा राजकीय कारणासाठी पूरेपूर वापर केला जातो. पण ज्या महिलांना न्याय मिळण्याची गरज आहे त्यांना न्याय मिळत नाही, असे त्या म्हणाल्या. ज्या महिलांवर अन्याय झाला आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संपर्क साधावा, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.