– माधव विद्वांस
अभिनेते, नाट्यनिर्माते व दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म 17 जून 1951 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण 12 वी पर्यंत झाले होते; पण ते अभिनयाचे जणू विद्यापीठच होते. विनय आपटे नावाचे वादळ रंगमंच, चित्रपट, जाहिराती, दूरदर्शन अशा विविध मनोरंजन क्षेत्रात जवळजवळ चार दशके घोंगावत होते.
त्यांनी विद्यार्थीदशेतच राज्य नाट्य स्पर्धेच्या “मॅन विदाउट शॅडो’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. पुंडलिक शेट्टीवार, कुल वृत्तांत, अपुरी या त्यांच्या एकांकिका गाजल्या. नाटक, चित्रपट, दूरदर्शन यातील विविध भूमिकांतून आपल्या अभिनयाचा स्वतंत्र असा ठसा उमटविल्यामुळे त्यांना चतुरस्र रंगकर्मी म्हणूनच ओळखले जायचे.
हिंदी सिनेमातही केलेल्या भूमिकांमुळे त्यांनी एक वलय निर्माण केले होते.छोट्या पडद्यावरील मालिकेतील कामामुळे ते प्रेक्षकांच्या जणू कुटुंबाचाच भाग बनले होते. त्यांनी जाहिरात संस्थेच्या माध्यमातून अनेक नावाजलेल्या जाहिरातींचे दिग्दर्शन केले.तंत्रज्ञानामध्ये वेगाने होत असणारे बदल स्वीकारणे तसेच हे बदल रंगकर्मींनी ओळखायला हवेत असा त्यांचा आग्रह असायचा.
त्यामुळे त्यांचा अभिनय, निर्मिती व दिग्दर्शन हे नव्या जुन्या पिढीतील लोकांना भावले. डोळ्याला डोळा भिडवून भारदस्त आवाजातील संवादफेक, प्रसांगानुरूप दिसून येणारी देहबोली व सहज अभिनय ही त्यांची खासियत होती.
अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाहपद त्यांनी दीर्घकाळ सांभाळले. नव्याने नाट्यक्षेत्रात येणाऱ्या नवोदितांना मार्गदर्शनाबरोबर उमेद आणि प्रोत्साहन ते देत असत. 1984च्या आशियाई गेम्सचे त्यांनी वार्तांकन करून त्यांच्यातील छुपा पत्रकार दाखवून दिला होता.
मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली आणि “नाटक’, “गजरा’, “युवावाणी’ अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. त्याचवेळी दूरदर्शनवर “आभाळमाया’ या मालिकेने मराठीत महामालिका सुरू झाल्या.
“एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेत त्यांची भूमिका होती. सुरुवातीला त्यांनी छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही अभिनय केला होता. त्यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले होते. महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी
या नावारूपाला आलेल्या अभिनेते दिग्दर्शकांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनीच प्रथम संधी दिली होती. नाटककार प्र. ल. मयेकर यांच्याबरोबर त्यांचे चांगले सूर जमले होते. तेंडुलकरांबद्दल त्यांना खूप आदर होता. त्यांची काही नाटकेही त्यांनी दिग्दर्शित केली. “गणरंग’ या व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी संस्थाही त्यांनी स्थापन केली होती.
सुमारे अभिनय व दिग्दर्शन असलेली 23 दूरदर्शन मालिका व सुमारे 50 चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. मराठी वाहिनीवरील “दुर्वा’ ही त्यांची मालिका अखेरची ठरली. 7 डिसेंबर, 2013 रोजी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या पत्नी वैजयंती आपटे यांनी “विनय आपटे’ प्रतिष्ठानची स्थापना केली असून नवोदितांसाठी प्रशिक्षण, पडद्यामागील कलाकारांना सन्मान मिळण्यासाठी तसेच वृद्धापकाळात त्यांना मानधन मिळेल असा प्रयत्न करण्याचे ठरविले आहे.