समीक्षेतील दीपस्तंभ, लेखक, पत्रकार, बालसाहित्यिक, अनुवादक म्हणून प्रसिद्ध शंकर सारडा यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म महाबळेश्वर येथे 4 सप्टेंबर 1937 रोजी झाला, तेथेच त्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण झाले तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. त्यांनी मराठी विषयात बी.ए. (पुणे) व एम.ए. (मुंबई) दोन्हीत सुवर्णपदक प्राप्त केले.
बालसाहित्य प्रकारात वर्ष 1950 पासूनच ते लेखन करीत होते. त्यांचे लेख लहानपणापासूनच आनंद, बालमित्र, साधना, मुलांचे मासिक यांसारख्या अंकांमधून प्रसिद्ध झाले होते. बालसाहित्यिक असल्याने त्यांच्या लेखनास गोडवा आला होता.
त्यांनी विविध वृत्तपत्रांमधील सदरातून लेखन केले. अनेक महत्त्वाच्या कविता-कादंबऱ्यांची परीक्षणे केली. त्यांनी 60 हून अधिक पुस्तके लिहिली असून दोन हजारांहून अधिक पुस्तकांचे समीक्षण केले आहे. समीक्षा, परीक्षण या रुक्ष वाटणाऱ्या लेखनातील प्रकारात रसग्रहण पद्धतीने काम करून गुणदोषांची उकल केल्यामुळे लेखकांना यथोचित मार्गदर्शन केले. त्यांनी नवोदित लेखकांना व पत्रकारांना प्रोत्साहनासह हातचे न राखता मार्गदर्शन केले. टॉल्स्टॉय, गिबन यांसारख्या प्रख्यात लेखकांच्या कादंबऱ्यांचा त्यांनी अनुवाद केला आहे.
त्यांच्या बालसाहित्यात “गुराख्याचे पोर’, “राक्षसाने उचलली टेकडी’, “मर्कटराजाच्या लीला’ अशी बालचमूस भावणारी विविध पुस्तके होती. “झिपऱ्या आणि रत्नी’, “नंदनवनाची फेरी’, “दूरदेशचे प्रतिभावंत’, “जेव्हा चुंबनाला बंदी होते’, “मांत्रिकाची जिरली मस्ती’, “स्त्रीवादी कादंबरी’, “विश्वसाहित्यातील फेरफटका’, “बेस्टसेलर बुक्स’, “ग्रंथ संवत्सर’, “ग्रंथ वैभव’, “ग्रंथ विशेष’ अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे. “दूरदेशीचे प्रतिभावंत’, “पुस्तकांचे जग’ या पुस्तकांमुळे त्यांचे नाव सर्वदूर झाले.
पुणे येथे स्थायिक होण्याच्या अगोदर त्यांचे सातारा येथे वास्तव्य होते. सातारा येथे त्यांनी प्राकृती प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून मुद्रण व्यवसायातील कौशल्यही दाखवून दिले होते. तसेच सातारा येथे झालेल्या 66 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. सातारा येथील ग्रंथ महोत्सव सुरू करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.
सातारच्या ग्रंथ महोत्सवामुळे अनेक प्रकाशकांना तसेच नवोदित लेखकांना पुस्तकाची ग्रामीण बाजारपेठ उपलब्ध झाली. या महोत्सवास जत्रेचे स्वरूप येते. शंकर सारडा यांनी आपल्या नियोजनाचा अनेक मराठी साहित्य संमेलनामध्ये ठसा उमटविला होता. अखिल भारतीय संमेलनाबरोबर विभागीय संमेलने भरवण्याचा पायंडा पाडला. साहित्य संमेलनाचे वृत्तांकन सारडा यांनी केले होते.
महाबळेश्वर येथील विभागीय साहित्य संमेलन, महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अधिवेशन, सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पहिले अभिजात साहित्य संमेलन, अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, वेदगंगा ग्रामीण साहित्य संमेलन व अंकुर साहित्य संमेलन अशा अनेक साहित्य संमेलनाचे आयोजन त्यांनी केले. वयाच्या 83व्या वर्षी 28 जानेवारी 2021 रोजी त्यांचे निधन झाले. सारडा यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्र दान करून त्यांनी सामाजिक बांधिलकी मृत्युपश्चातही जपली होती.