– माधव विद्वांस
“रजनी’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली सर्वांची प्रिया अर्थातच प्रिया तेंडुलकर यांचे उद्या पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबई येथे झाला. प्रसिद्ध नाटककार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांच्या त्या कन्या. विजय तेंडुलकर लहानपणापासून त्यांच्यासाठी आदर्श होते, तसेच मित्र होते.
लहानपणी त्या एकदम लाजऱ्या, हळूबाई होत्या. वडिलांकडून बंडखोर सर्जनशीलता व लेखनगुणांचा वारसा त्यांना मिळाला. नाटक, सिनेमा, छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करीत असताना लेखिका म्हणून ओळख निर्माण केली. गिरीश कर्नाड यांच्या हयवदन या नाटकातून वर्ष 1969 मध्ये त्यांनी रंगमंचावर पहिले पाऊल ठेवले.
सुरुवातीस पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वागतिका, हवाईसुंदरी व मॉडेल म्हणूनही काम केले. वडिलांबरोबर त्या नाट्यसृष्टीत आल्या असल्या तरी त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. “तो राजहंस एक’ हे त्यांचे पहिले नाटक. वयाच्या अठराव्या वर्षी शिरिष पै यांच्या “कळी एक फुलत होती’ या नाटकात काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
त्यानंतर त्यांनी “बेबी’, “एक हट्टी मुलगी’, “सखाराम बाईंडर’, “कन्यादान’, “कमला’, “गिधाडे’, “फुलराणी’ आदी नाटकांत भूमिका केल्या. त्यांनी रवींद्र महाजनी, अशोक सराफ आणि महेश कोठारे यांसारख्या मराठी दिग्गजांबरोबर काम केले होते. बॉलिवूडमध्ये त्यांनी हिंदी व मराठीसह गुजरातीतही आपली चमक दाखवून दिली. चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला.
प्रिया तेंडुलकर यांनी प्रामुख्याने अनेक कौटुंबिक मालिका व चित्रपटांमध्ये काम करताना अनेक सामाजिक विषय प्रभावीपणे हाताळले. त्या स्वतः चित्रकार होत्या. आपल्या चित्राची प्रदर्शनेही त्यांनी भरवली होती. बी.ए. झाल्यानंतर जे. जे. मधून चित्रकला विषयातील प्रशिक्षणही त्यांनी घेतले होते.
“जन्मलेल्या प्रत्येकाला’ या त्यांच्या कथासंग्रहाला दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला होता. तसेच “जगले जशी’, “ज्याचा त्याचा प्रश्न’, “जावे तिच्या वंशा’ आदी पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळाला. एक वेगळ्या वाटेने जाणारी कथालेखिका म्हणून त्यांनी आपली ओळख साहित्य क्षेत्रामध्ये निर्माण केली.
वर्ष 1985 मध्ये “रजनी’ या मालिकेमुळे त्या लोकप्रिय झाल्या. बासू चटर्जींच्या या मालिकेतून सामान्य माणसाला भोगाव्या लागणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सामान्य गृहिणीची भूमिका सर्वांनाच भावली. रजनी मालिकेत करण राजदान व प्रिया पती-पत्नीची भूमिका करीत असताना दोघेही प्रेमात पडले. त्याची परिणिती विवाहामध्ये झाली. मात्र हा विवाह फक्त सात वर्षेच टिकला व दोघेही विभक्त झाले.
वर्ष 1995 मध्ये एकता कपूरच्या “हम पॉंच’ या विनोदी मालिकेत शोभा आनंद, वंदन पथक तसेच विद्या बालन आणि अशोक सराफ यांच्याबरोबर मृत आत्म्याचे एका फोट फ्रेममधून काम केले. ही मालिकाही प्रेक्षकांना आवडली. या पैकी विद्या बालन ही अभिनेत्री पुढे चित्रपटातही चमकली.
त्यांनी “प्रिया तेंडुलकर टॉक शो’मधून राजकीय व सामाजिक विषयांना स्थान दिले. त्याचबरोबर “अडोस-पडोस’, “जिंदगी’, “खानदान’, “बॅ. विनोद’, “हम पॉंच’, “दामिनी’ यांसारख्या मालिकांतून त्यांनी त्यांच्यातील अभिनयाचे विविध पैलूंचे दर्शन घडवले. या लोकप्रिय अभिनेत्रीचे वयाचे 48 व्या वर्षी कर्करोगामुळे 19 सप्टेंबर 2002 रोजी मुंबई येथे निधन झाले.