माधव विद्वांस
मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक आत्माराम रावजी देशपांडे यांचा आज स्मृतिदिन. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म विदर्भातील अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर येथे 11 सप्टेंबर 1901 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मूर्तिजापूर येथेच झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते वर्ष 1919 मध्ये पुणे येथे आले व फर्गसन महाविद्यालयात कलाशाखेत त्यांनी प्रवेश घेतला.
वर्ष 1924 मध्ये तत्त्वज्ञान हा विषय घेऊन एमए झाले. त्यानंतर वर्ष 1925 मध्ये एलएलबी झाले. त्यांनी अमरावतीला वकिली सुरू केली. मध्यंतरीच्या काळात त्यांनी कोलकाता येथील शांतिनिकेतनमध्ये नंदलाल बोस यांच्याकडे भारतीय चित्रकलेचा रितसर अभ्यास केला. वर्ष 1925 मध्ये होशंगाबाद (मध्य प्रदेश) येथे सब-जज म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली.
कवितेसोबतच भारत सरकारच्या समाज शिक्षण खात्याचे संचालक (1948-1952) म्हणून व नॅशनल फंडामेंटल एज्युकेशन विभागाचे संचालक झाले. देशाच्या शैक्षणिक धोरणातले त्यांचे योगदान लक्षणीय आहे. युनेस्कोच्या साक्षरता प्रसार तज्ज्ञ समितीवर त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या समितीच्या पॅरिस येथील बैठकीच्या (1962) अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड झाली होती. केंद्र व राज्य सरकारांच्या अपारंपरिक शिक्षण, प्रौढ शिक्षण, सर्व शिक्षा अभियान इत्यादी उपक्रमांची सुरुवात त्यांच्या अनुभवातूनच झाली.
मुक्तछंद प्रकाराबरोबर 10 चरणांची (दशपदी) कविता हा काव्यप्रकारही त्यांनी सुरू केला. पुणे येथे फर्गसन महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांचा कुसुम जयवंत ह्या तरुणीशी परिचय झाला, साहित्य गप्पांचे प्रेमात रूपांतर होऊन 6 ऑक्टोबर 1929 रोजी अनिल व कुसुमावती यांचा विवाह झाला. कुसुमावती ह्या प्रसिद्ध मराठी लेखिका व टीकाकार म्हणून प्रसिद्ध होत्या.कुसुमानिल (1972) या नावाने उभयतांच्या प्रेमजीवनाचे दर्शन घडविणारा पत्रव्यवहार प्रसिद्ध झालेला आहे.
त्यांच्या काव्यलेखनास वर्ष 1930 मध्ये सुरुवात झाली. “हृदयी लावियली फुलवात’ अशा ओळी घेऊन वर्ष 1932 मध्ये “फुलवात’ हा कवी अनिल यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यांची ओळख साहित्यविश्वाला झाली. भग्नमूर्ती (दीर्घकाव्य) 1935, प्रेम आणि जीवन (1935), निर्वासित चिनी मुलास (दीर्घकाव्य) 1943, पेरते व्हा, ‘1947 नंतर सांगाती’ (1961) व “दशपदी’ (1976) हे कवी अनिल यांचे आणखी कवितासंग्रह प्रसिद्ध झाले.
बहुतेक काव्यरचनांमध्ये त्यांनी मुक्तछंद वापरला आहे. कवी अनिलांच्या एकूण 16 अजरामर कविता ध्वनिमुद्रित झालेल्या आहेत. त्यापैकी अजुनी रूसून आहे, केळीचे सुकले बाग, आज अचानक गाठ पडे, थकले रे डोळे माझे, कुणी जाल का सांगाल का, गगनी उगवला सायंतारा, ही गीते प्रसिद्ध व श्रवणीय आहेत.
ते ज्ञानेश्वरांचे भक्त होते. त्यांनी ज्ञानेश्वरांचेवर सहा कडव्यांची सुंदर कविता लिहिली आहे. ही कविता आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केली व रवींद्र साठे यांनी स्वरबद्ध केली आहे. कवी अनिल यांचे 8 मे 1982 रोजी नागपूर येथे निधन झाले.