माधव विद्वांस
संगीतकार, गायक व नाट्यअभिनेते रामचंद्र पुरुषोत्तम मराठे तथा पंडित राम मराठे यांची आज जयंती. त्यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1924 रोजी पुणे येथे झाला. राम मराठे हे पं. मनोहर बर्वे, पं. यशवंतबुवा मिराशी, मास्तर कृष्णराव, आग्रा घराण्याचे उस्ताद विलायत हुसेन खॉं व पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकले. तसेच पं. गजाननबुवा जोशी यांच्या गायकीचाही त्यांच्यावर प्रभाव होता. ते शिक्षणासाठी मुंबई येथे आले व त्यांना या क्षेत्रातील शिक्षणाची दारे उघडी झाली.
आग्रा घराण्याचे सुंदर बंदिशीं तयार करणारे ज्येष्ठ गायक पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे त्यांची तालीम सुरू झाली. जगन्नाथबुवा “गुणीदास’ या नावाने नवीन राग निर्मिती करीत असत. संगीतनाटकांच्या जमान्यात संगीत आणि गायकी याला मोठे स्थान होते. गाण्यांची व संगीताची कथानकाला साजेशी जोड असे. पंडित मराठे यांनी संगीत,
अभिनय आणि गायन या त्रिसूत्रीवर निर्विवाद वर्चस्व राखले. सुमारे 600 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या संत कान्होपात्रा या चरित्रावर आधारित नाटकात संत कान्होपात्रा यांनी रचलेला आगा वैकुंठीच्या राणा हा अभंग त्यांनी भैरवी स्वरूपात गायला व काळाच्या पडद्याआड गेलेल्या कान्होपात्राची लोकांना आठवण करून दिली.
कान्होपात्राने रचलेला हा अभंग गाताना तिने विठ्ठलास घातलेले आर्त साकडे काळजाचा ठाव घेते, तसेच कान्होपात्राचे मनोगतही संगीत व गायनातून प्रभावीपणे त्यांनी सादर केले आहे. मास्टर कृष्णराव आणि पं. विनायकबुवा पटवर्धन यांनी याला संगीत दिले होते.
त्यांनी सुमारे 32 गीते स्वतः गायली, तसेच 28 नाट्यगीतांना संगीत दिले. प्रसिद्ध तत्कालीन गायिका मोघुबाई कुर्डीकर यांनी राम मराठ्यांना जोड आणि अनवट रागांचा बादशहा म्हणून गौरवले होते. त्यांच्यावर अनेक हिंदुस्थानी संगीत परंपरेतील घराण्यांचे संस्कार झाले;
पण ते कुठल्याही एकाच घराण्याच्या चौकटीत गेले नाहीत. विद्याधर गोखले यांनी “संगीत मंदारमाला’ हे नाटक सतराव्या-अठराव्या शतकातील एका राजस्थानी वनवासी संगीतकाराचे कथानकावर लिहिले.
या नाटकाला रसिकांनी डोक्यावर घेतले. विद्याधरजींच्या लेखणीतून उतरलेल्या या नाटकास पंडित राम मराठे आणि प्रसाद सावकार यांनी त्यांच्या जुगलबंदी व गायकीने साज चढविला. पुढे तर कधीकधी नाटकाचे दिवसाला तीन-तीन प्रयोग होऊ लागले. या नाटकाचे असे एकूण 1200 हून अधिक हाउसफुल्ल प्रयोग झाले. नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा करमरकर यांनी केले होते; तर संगीत दिग्दर्शन रामभाऊ मराठे यांचे होते.
त्यांना शासकीय व नाट्यरसिकांचे मार्फत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यांना महाराष्ट्र शासनाने संगीतभूषण किताबाने गौरविले. तसेच 1987 साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला. जून 1985 पासून तळेगाव दाभाडे येथील श्रीरंग कलानिकेतन यांचे मार्फत पं. राम मराठे यांच्या नावाची संगीत स्पर्धा घेतली जाते.
या स्पर्धेसाठी सुगम संगीत, नाट्य संगीत, शास्त्रीय संगीत, पेटी वादन, तबला वादन, पखवाज वादन यांपैकी कोणताही एक प्रकार निवडता येतो. विजेत्याला रोख पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येते. 4 ऑक्टोबर 1989 रोजी पं. राम मराठे यांचे निधन झाले.