नाटककार, कवी “कुमुदबांधव’ यांचा आज जन्मदिन. त्यांचे पूर्ण नाव सदाशिव अनंत शुक्ल. त्यांचा जन्म 26 मे 1902 रोजी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. ध्वनिमुद्रिकांच्या जमान्यात ते नावाजलेले कवी, नाटककार होते. त्यांनी लहान मुलांसाठीही विविध प्रकारचे लेखन केले आहे.
लेखन हेच त्यांचे चरितार्थाचे साधन होते. त्यामुळे काव्य, नाटक, लघुकथा, चित्रपटकथा लेखन हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता. लिखित साहित्याबरोबर त्यांना धर्मशास्त्र, ज्योतिष, तत्त्वज्ञान या विषयांतही गोडी होती. थोडेच पण दर्जेदार साहित्याची त्यांनी निर्मिती केली. “वाचावे, अभ्यास करावा, मग लिहावे’ हा त्यांचा शिरस्ता होता. वर्ष 1920 पासून त्यांनी “कुमुदबांधव’ या टोपण नावाने काव्यलेखन सुरू केले. वर्ष 1937 मध्ये “प्रेमवीर’ या बोलपटासाठी त्यांनी पहिल्यांदा गीतलेखन केले व त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. वर्ष 1938 मध्ये राजा पंडित यांच्या “ध्रुव’ या चित्रपटासाठी त्यांनी कथा-पटकथा-संवाद आणि गीतलेखन केले.
प्रभातच्या वर्ष 1944 मधील “रामशास्त्री’ या गीतलेखनासाठी प्रभात कंपनीने त्यांना बोलावून घेतले. त्याच वर्षी विनायकांनी “गजाभाऊ’चे लेखन त्यांच्याकडून करून घेतले. तेव्हा शुक्ल स्वतः कथा, संवाद सांगत असत. कुमुदबांधवांचा चित्रपट, नाटक क्षेत्रात त्यांचा त्या काळी मोठा बोलबाला होता. त्यांनी अनेक नाटक व भावगीतांबरोबरच मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. ते शीघ्र कवी होत. त्यांनी लिहिलेली गीते अर्थपूर्ण, विरह, प्रेम, शृंगार तसेच भक्तिरसाने ओथंबलेली असायची. त्यांनी लिहिलेली नाटके जरी पौराणिक विषयांवर असली तरी त्यातूनही त्यांनी सामाजिक जाणिवेला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला.
“दूर व्हा सजना येऊ नका’ हे युगलगीत प्रकारातील गीत “या मालक’ चित्रपटासाठी त्यांनी रचले. त्याला स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केले व अशा भोसले व मन्ना डे यांनी ते गायले. “जरा हळू जपून चाल बाई गं’ हे त्यांनी रचलेले, जी. एन. जोशी यांनी संगीतबद्ध केलेले व लीला लिमये यांनी गायलेले भावगीत तसेच “नाचती ओठांवरती हे बोल वेड्या प्रितीचे’ जी. एन. जोशी यांनी संगीतबद्ध केलेले ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेले भावगीतही त्यांनीच लिहिले होते. “ब्रिजलाला गडे पुरवी’, हे मिश्रपिलु रागातील नाट्यगीत केशवराव भोळे, सुरेशबाबू माने, बालगंधर्व या तिघांनीही संगीतबद्ध केले होते. त्यांनी रचलेली जवळजवळ 26 भावगीते, नाट्यगीते, ध्वनिमुद्रित झाली होती.
गीत लेखनाबरोबरच चित्रपट संवाद, कथा, नाटके, बालनाटके त्यांचे नावावर आहेत. त्यांनी वीर अभिमन्यू, जंगल्या भिल्ल, नवलनगरची राजकन्या, जयद्रथ वध वगैरे मुलांसाठी नाटिका लिहिल्या होत्या. 1967 साली पुण्यात भरलेल्या 48 व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 7 जानेवारी 1968 रोजी त्यांचे निधन झाले.