– माधव विद्वांस
जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका व संगीतकार, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 10 एप्रिल, 1931 रोजी मुंबई येथे झाला. प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर व वडील माधवदास भाटिया हे त्यांचे माता-पिता. त्यांनी आपल्या आईकडून संगीताचे धडे लहानपणापासूनच घेतले. वडिलांच्या निधनानंतर आईने त्यांचे संगोपन केले. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई येथील बालमोहन व प्रार्थना समाज या शाळांमध्ये झाले. मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. उस्ताद अल्लादियाखॉं हे मोगूबाईंना गायनाची जी तालीम देत असत तोच संस्कार बालवयातच त्यांच्यावर झाला. मोगूबाईंनी आपल्या कन्येस जयपूर घराण्याची तालीम दिली.
आईशिवाय बाळकृष्ण पर्वतकर, अन्वर हुसेन खॉं, जयपूर घराण्याचे मोहनराव पालेकर, भेंडीबाजार घराण्याच्या अंजनीबाई मालपेकर व मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर, शरदचंद्र आरोलकर यांच्याकडेही त्यांनी मार्गदर्शन घेतले. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या गायकांची गायकी अभ्यासली. ख्याल गायकी तसेच ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकार त्या प्रभावीपणे सादर करीत. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडूनही काही बंदिशी त्या शिकल्या. लहानपणापासूनच त्यांना गायनाची आवड असल्याने किशोरीताईंनी अल्पवयातच रागगायनात प्राविण्य मिळवले.
भारताच्या प्राचीन संगीत परंपरेचा शोध व प्रसार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भावप्रधान गायकी शास्त्रीय संगीतात त्यांनी पुनरुज्जीवित केली असे मानले जाते. संत साहित्याचे विशेषत: संत ज्ञानेश्वरांच्या साहित्याचाही त्यांनी अभ्यास केला होता. 1955 साली किशोरी यांचा विवाह रवींद्र आमोणकर यांच्याशी झाला. त्यांना बिभास व निहार ही दोन मुले झाली. त्यांची नात तेजश्री आमोणकर हिने त्यांचा वारसा जपला आहे.
वर्ष 1950च्या दरम्यान किशोरी यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीस प्रारंभ केला. वर्ष 1964 मध्ये हिंदी चित्रपट “गीत गाया पत्थरोंने’मधील सॉंसों के तार पर, धडकन कि ताल पर या गीतासाठी आपला आवाज दिला होता. वर्ष 1991 मध्ये प्रसारित झालेल्या “दृष्टी’ या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. देवकी पंडित, माणिक भिडे, पद्मा तळवलकर, अरुण द्रविड, सुहासिनी मुळगांवकर, रघुनंदन पणशीकर, मीरा पणशीकर, अशा नवीन पिढीतील गायकांनाही किशोरी यांनी मार्गदर्शन केले होते. संत सोयराबाई यांचा “अवघा रंग एक झाला’ हा त्यांनी गायलेला अभंग खूपच लोकप्रिय झाला. त्यांनी “स्वरार्थरमणी-रागरससिद्धान्त’ हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे.
किशोरी आमोणकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. भारत सरकारने पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. दरवर्षी नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे किशोरी आमोणकर यांच्या नावाचे पुरस्कार दिले जातात. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी “गानसरस्वती महोत्सव’ नावाचा गायन-वादन-नृत्य असा 3 दिवसांचा संगीताचा कार्यक्रम होतो. अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांनी किशोरीताईंच्या सांगीतिक कारकिर्दीवर “भिन्न षड्ज’ हा माहितीपट दिग्दर्शित केला आहे. 3 एप्रिल 2017 रोजी त्यांचे निधन झाले.