कादंबरीकार, कवी, समीक्षक, ग्रामीण कथालेखक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे आज अभीष्टचिंतन (29 मार्च 1948). त्यांचे शालेय शिक्षण मुखेड येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण देगलूर येथे पूर्ण झाले. बी.ए. मराठीमध्ये ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात पहिले आले, त्यावेळी ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते. त्यांनी 1980 मध्ये मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून “शंकरराव पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर पीएच.डी. मिळवली.
मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बीड येथे महाविद्यालयात नोकरीला सुरुवात केली. त्यानंतर ते औरंगाबाद येथे विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक झाले. वर्ष 1993 मध्ये पुणे विद्यापीठात प्राध्यापक बनले. तेथे ते विभागप्रमुख म्हणून काम करीत असताना त्यांची औरगांबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक झाली.
महाराष्ट्रात प्रथमच औरंगाबाद येथे कॉपीमुक्ती अभियान राबवून ते यशस्वी करणारे कुलगुरू ठरले. कॉपीमुक्तीसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना अंतर्मुख करणारे एक पत्र प्रसिद्ध केले. हे पत्र खूपच प्रभावी ठरले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्त कॉपीमुक्ती स्वीकारली. विद्यार्थी संघटना व विद्यापीठ प्रशासन यांच्यात त्यांनी समन्वय निर्माण केला. विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात शिक्षण घेताना त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेत नोकरी केली. साहित्य परिषदेच्या खोलीत राहून शिक्षण पूर्ण केले होते.
ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यांनी कुलगुरू झाल्यावर “कमवा व शिका’ ही योजना प्रभावीपणे राबविली होती. मराठी ग्रामीण साहित्यात कोतापल्ले यांचे मोठे योगदान आहे. “राजधानी’, “वारसा’, “सावित्रीचा निर्णय’ या त्यांच्या दीर्घकथा प्रसिद्ध आहेत. मनाचा ठाव घेणाऱ्या “गांधारीचे डोळे’, “मध्यरात्र’, “पराभव’ या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या आहेत. त्यांच्या सामाजिक व परिवर्तनवादी विचारांची ओळख करून देणारा “ज्योतीपर्व’ हा ग्रंथ महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित आहे.
बी रघुनाथ, शंकर पाटील यांच्यावरही पुस्तके आहेत. त्यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक घडामोडीतून उपस्थित होणारे प्रश्न आणि त्यातून निर्माण झालेल्या संघर्षाचे वस्तुनिष्ठ वर्णन त्यांच्या कथांमधून केलेले जाणवते. लेखनाबरोबरच त्यांनी अनेक शासकीय तसेच शिक्षण क्षेत्रातील संस्थांमध्येही काम केले. महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था (मुंबई) आणि साहित्य अकादमी (दिल्ली) या संस्थांच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले.
महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समिती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, धारवाड, बनारस हिंदू विद्यापीठ, म.स.वि. वडोदरा इत्यादी विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्य होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे (औरंगाबाद) कार्याध्यक्ष पदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) उपाध्यक्षपदीही ते होते.
श्रीगोंदा येथे 1999 साली झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि 2005 साली जालना येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. डॉ. कोत्तापल्ले हे चिपळूण येथील 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाच्या 12 पुरस्कारांसह सुमारे 15 संस्था पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
माधव विद्वांस