लोकसभेनंतर चारच महिन्यांत प्रभावहीन : पिंपरी, भोसरी, मावळ विधानसभेतील उमेदवारांचे “डिपॉझिट जप्त’
पिंपरी – लोकसभा निवडणुकीत प्रभावशाली ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीचा “फॅक्टर’ चार महिन्यातच विधानसभा निवडणुकीत प्रभावहिन ठरल्याचे दिसत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघ व मावळ विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदारांनी साफ नाकारल्याचे चित्र निकालानंतर दिसून आले आहे. पिंपरी मतदारसंघामध्ये वंचित आघाडीच्या उमेदवाराने जोर लावला असला तरी उमेदवाराचे डिपॉझिटही वाचवता आलेले नाही.
लोकसभा निवडणुकीच्या अगोदर प्रकाश आंबेडकर व असउद्दीन औवेसी यांनी मिळून स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात आपला प्रभाव दाखवत 40 लाखांहून अधिक मते मिळवली होती. मात्र “एमआयएम’शी फारकत घेतल्यानंतरही वंचित आघाडीचा फॅक्टर प्रभावशाली ठरेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ विधानसभा मतदारसंघात मतदारांनी वंचित आघाडीला साफ नाकरल्याचे दिसून आले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडीचा उमेदवार उभा नव्हता. मात्र, पिंपरी या राखीव मतदारसंघात वंचित आघाडीने चांगलाच जोर लावला होता. या मतदारसंघासाठी खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीही सभा घेतली होती. त्यामुळे, या मतदारसंघात वंचितचा उमेदवार चांगली लढत देईल, अशी स्थिती होती. वंचितच्या उमेदवारामुळे आघाडीच्या अण्णा बनसोडे यांना फटका बसेल, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. मात्र मतमोजणीनंतर वंचितचे प्रवीण उर्फ प्रकाश गायकवाड यांना मतदारांनी साफ नाकरल्याचे दिसून आले. त्यांना अवघी 13 हजार 165 मते मिळवता आली. तर भोसरी मतदारसंघात वंचितकडून उभे राहिलेले शहानवाज शेख यांनाही अवघी 13 हजार 165 मते मिळवता आली. त्यांना एकूण मतदानाच्या अवघी पाच टक्के मते मिळविली. त्यावरुन पिंपरी-चिंचवड शहरात वंचित आघाडीच्या फॅक्टरला मतदारांनी नाकरल्याचे दिसून आले.
मावळ मतदारसंघात, तर वंचितच्या उमेदवाराची चांगलीच वाताहत झालेली पहायला मिळाली. येथे वंचितचे उमेदवार रमेश ओव्हाळ यांना अवघी 2 हजार 728 मते घेतली. त्यामुळे अवघ्या चार महिन्यातच पिंपरी-चिंचवड शहरासह मावळमधून “वंचित’चा प्रभाव संपुष्टात आल्याचे दिसून आले आहे.