वाल्हे – “रेल्वे प्लॅटफार्मवरून दुचाकीचा प्रवास’ या मथळ्याखाली शनिवारी (दि. 12) वृत्त प्रसिद्ध झाल्याने रेल्वे प्रशासनासह सुकलवाडी, वाल्हे ग्रामपंचायत खडबडून जागी झाली अन् वेल्ह्यातील भुयारी मार्गात साचलेले पाणी काढण्याचे काम सुरू झाले आहे. तर रेल्वे फलाटवरून (प्लॅटफार्म) दुचाकी घेऊन मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान, सकाळी पाणी काढल्यानंतर दुपार पर्यंत पुन्हा या भुयारी मार्गामध्ये पाणी येत आहे त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनार मोठा अडथळा होत आहे.
पुणे-पंढरपूर महामार्गावरील वाल्हे (ता. पुरंदर) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाकडे जाण्यासाठीचा मुख्य मार्ग असलेल्या, तसेच सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी, राख, कापडदरा, झिरप वस्ती आदी लहान-मोठ्या वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील सुकलवाडी रेल्वे गेट येथील भुयारी मार्गावर पावसाचे पाणी साचून राहत असल्याने पर्याय मार्ग असलेल्या रेल्वे स्थानकाच्या पाठीमागील रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचून चिखल तयार झाल्याने, अनेक प्रवासी वाल्हे रेल्वे स्थानकावरील फलार्टवरून दुचाकी घेऊन जात होती.
या संदर्भात “प्रभात’ने वृत्त प्रकाशित केल्याने स्थानिक रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मवरून दुचाकी घेऊन जाण्यास मनाई केल्याने या मार्गावर जाणाऱ्यांन समोर मोठे संकट निर्माण झाले आहे. साचलेल्या पाण्यामधून वाहणे नेल्याने अनेक वाहने बंद पडल्याच्या घडना दररोज घडत आहेत. तरी रेल्वे प्रशासनाने यांची गंभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी सरपंच दत्तात्रय पवार, सुकलवाडीच्या सरपंच जयश्री चव्हाण, उपसरपंच धनंजय, उद्योजक राहूल यादव, तंटामुक्ती अध्यक्ष नारायण पवार, सत्यवान सूर्यवंशी, डॉ. रोहिदास पवार, उद्योजक राजेंद्र पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संदेश पवार, प्रदीप चव्हाण, सुधाकर पवार आदींनी केली आहे.
रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मवरून दुचाकी वाहन नेण्यास मज्जाव केल्याने, अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर, अत्यावश्यक सेवा एखाद्या व्यक्तीला द्यायची झाल्यावर कशी देणार ? तसेच वाल्हे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी येथील कर्मचारी वर्गाला “घर टू घर’ सर्वेक्षणाला येणा-यासाठी व जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती. काही कर्मच्याऱ्यांना दुचाकी वाहने रेल्वे स्थानकाच्यावरील प्लॅटफॉर्मवरून येऊ न दिल्याने दुचाकी रेल्वे स्थानकाच्या पाठीमागे लावून सर्वेक्षणासाठी चालत प्रवास करावा लागला. आम्हाला कायमस्वरूपी उपाययोजना होईल, असे काम पूर्ण करा, अशी मागणी येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.