हवामानातील बदलाचा फूल उत्पादनाला फटका
पोषक थंडी नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले
पवनानगर – प्रेमाच्या नात्यांची वीण घट्ट करणारा “व्हॅलेंटाइन डे’ अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. परदेशी बाजारपेठेत मावळातील गुलाबास अधिक पसंती असली तरी हवामानातील बदलामुळे यंदा उत्पादनात घट झाली. विशेष म्हणजे पोषक थंडीअभावी फूल वेळीपूर्वीच काढणी योग्य झाली मात्र निर्यात होऊ शकली नाही. त्यामुळे फूल उत्पादकांना आस्मानी संकटाचा चांगलाच फटका बसला आहे. याशिवाय करोना महामारी, दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि वातावरणातील बदलाचा मावळ तालुक्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फूल उत्पादन मावळ तालुक्यात होते. तालुक्यात 350-400 हेक्टर क्षेत्रावर पॉलिहाऊस शेती आहे. यामध्ये 250 हेक्टर क्षेत्रावर गुलाब शेती केली जाते. उर्वरित 25 हेक्टर क्षेत्रावर जरबेरा, कार्नेशन व अन्य भाजीपाला पिके घेतली जातात. दरवर्षी फुले देशासह परदेशातही मोठ्या प्रमाणात निर्यात होत असतात.
“व्हॅलेंटाइन’ काळात या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. जपान, इंग्लड, फ्रान्स, हॉलंड, ऑस्टेलिया, दुबई या देशात विशेष मागणी आहे. मात्र गतवर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे बहुतेक मावळातील 331 शेतकऱ्यांच्या सुमारे 200 हेक्टर क्षेत्रावरील पॉलिहाऊसला फटका बसला. त्यामुळे यंदा उत्पादनावर परिणाम झालेला दिसून येतो. शासकीय मदत मिळाली नसली तरी आस्मानी संकटाशी दोन हात करीत शेतकऱ्यांनी पुन्हा उभारी घेत फूलशेती फुलवली आहे.
साधारणत: 25 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या काळात गुलाब फूल परदेशात निर्यात केली जातात. निर्यातक्षम फुले उत्पादनासाठी शेतकरी दोन महिने अगोदरच तयारी सुरू करतात. 1 ते 10 डिसेंबरच्या कालावधीमध्ये झाडांची कटिंग व बेंडिग केली जाते. फूलशेतीस चांगल्या प्रतीची खते दिली जातात. कोणत्याही प्रकारच्या रोगास बळी पडू नये म्हणून विविध औषधांची फवारणी केली जाते. त्यांची प्रत व दर्जा चांगला ठेवला जातो. 28 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या काळात फुले विक्रीसाठी तयार केली जातात. त्यासाठी विशेष काळजी घेतली जाते.
मात्र यंदा फूल वाढीसाठी पोषक थंडी नसल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. या काळात प्रती एकरी 40 हजार निर्यातक्षम फुले उत्पादन घेतले जाते. “व्हॅलेंटाइन डे’साठी लाल फुलांनाच अधिक मागणी असते. निर्यातक्षम फुलांची सकाळी 7 ते 9 या वेळेत त्यांची कटिंग (हारवेस्टिंग) केली जाते. त्या फुलांची दांडीचा डेलिफिंग मशिनने काही पाने कापली जातात. त्यानंतर ही फुले शीतगृहात ठेवली जातात. निवडलेली सर्व फुले सेंटीमीटरनुसार निवडली जातात. त्यातून ए-ग्रेड, बी-ग्रेड, सी-ग्रेड या ग्रेडनुसार निवडली जातात. त्यांचे मागणीनुसार 10 आणि 12 फुलांचे गड्डा (बंच) तयार केले जातात.
या काळात गुलाबशेती आणि फुलांची खास काळजी घेतली जाते.
फूल खराब होऊ नये याची खबरदारी घेण्याकडे उत्पादकांचा कल पाहवयास मिळतो. परदेशी बाजारपेठेत पाठवण्यापर्यंतची फुलांना जपले जाते. या काळात “टॉपसिक्रेट’ (लाल) जातीला मोठी मागणी यावर्षी आहे. सोलीयर (पिवळा), आवलांच (पांढरा), गालस्टराईक (पिवळा), ट्राफिकल (नारंगी) या फुलांच्या रंगाना वाढती मागणी आहे. उत्पादकांजवळील फुलांचा हंगाम संपत असल्यामुळे स्थानिक बाजारात तुटवडा भासत आहे.
यंदा स्थानिक बाजारपेठेवर मदार
निसर्ग चक्रीवादळामुळे यंदा बहुतेक ठिकाणी पॉलिहाऊस उद्ध्वस्त झाले आहेत. शासनदरबारी पॉलिहाऊस मालकांच्या पदरी निराशा आली, त्यामुळे बहुतेक उत्पादकांनी यंदा फूल शेतीकडे पाठ फिरविली. याशिवाय करोनामुळे भारतातून परदेशातील विमानसेवा बंद आहे, ज्या देशात विमानउडाण सुरू आहे, तिथे गुलाब पोहचत असला तरी विमानउडाण कमी होत असल्यामुळे ती खर्चिक आहे. पर्यायाने वाहतूक खर्च वाढल्याने फूल उत्पादकांना नफा घटला आहे. याशिवाय यंदा स्थानिक बाजारपेठेत गुलाब विक्री करण्यावर बहुतेक उत्पादकांचा भर राहणार आहे, असे पवना फूल उत्पादक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकर यांनी दिली.
बदलत्या हवामानामुळे यंदा दरवर्षीच्या तुलने साधारणत: 30 टक्के एवढी निर्यात झाली आहे. थंडी गायब असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नियोजन पूर्णत: फसले आणि 52 दिवसांत तयार होणार फूल यंदा 42-43 दिवसांत विक्रीस योग्य झाले. त्यामुळे निर्यात झाले, नाही आणि ऐनवेळी स्थानिक बाजारपेठेत फूल विक्री करावी लागली. दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन, करोना महामारी, हवामानातील बदल यामुळे यंदा फूल उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. याशिवाय विवाह सोहळ्यातही डेकोरेशनसाठी सध्या फुलांचा वापर केला जात नाही. गतवर्षी 15 रुपयांना विक्री होत असलेला गुलाब यंदा सर्वोत्तम फूल हे 12 रुपयांना विक्री केली. स्थानिक बाजारपेठेत 9 फेब्रुवारीनंतर गुलाबाला मागणी वाढते, मात्र तोपर्यंत फूल उत्पादकांकडे गुलाब शिल्लक नाही.
– मुकूंद ठाकर, अध्यक्ष, पवना फूल उत्पादक संघ.