पारगांव शिंगवे – कळंब-रांजणी जिल्हा परिषद गट विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो. या गटात झालेल्या विकासकामांच्या माध्यमातून वळसे पाटील यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि शरद सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे यांनी शनिवारी (दि. 5) दिली.
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार तथा माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी सकाळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वळती गावठाणात प्रत्येक घरांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधला.
वळसे पाटील यांच्या माध्यमातून वळती गाव व परिसरात झालेली विकासकामे सांगण्यात आली, त्यावेळी लोंढे बोलत होते. याप्रसंगी भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक किसनराव लोखंडे, अर्जुन अजाब, उपसरपंच ज्ञानेश लोंढे, धोंडीभाऊ भोर, तबाजी लोखंडे, ज्ञानेश्वर भोर, गोविंद गांजवे, बाबाजी लोखंडे, शिवाजी लोखंडे, महादेव भोर, डॉ. अशोक भोर, गणपत लोंढे, अनिल वाजे, डॉ. शिवाजी भोर, संपत बेनके, हरिभाऊ अजाब, आनंद लोंढे, अतुल भोर, संतोष भोर, अभिजीत लोंढे, सुजित लोंढे, भर्तरी लायगुडे, दगडू अजाब, विवेक कवडे, संतोषबन्सी भोर, विठ्ठल गांजवे, मुक्ता क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
वळती परिसरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे वळसे पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत. वळती ते नागापूर दरम्यान झालेला मीना नदीवरील पूल, गावात सभामंडप, भागडेश्वर डोंगर परिसरात पर्यटन केंद्राला वळसे पाटील यांनी मंजुरी मिळवून आणली आहे. मीनानदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे झाल्याने या भागातील परिसर बागायती झाला आहे. याचे श्रेय वळसे-पाटील यांना जाते. या परिसरात झालेली कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या जोरावर येत्या विधानसभा निवडणुकीत वळसे-पाटील यांनाच सर्वाधिक मताधिक्य मिळेल, अशी खात्री पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
पदाधिकारी लागले झटून कामाला
वळसे पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी पदाधिकारी झटून कामाला लागले आहेत. वळती गाव, गांजवेवाडी परिसरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन पक्षाच्या माध्यमातून झालेली विकासकामे सांगून प्रलंबित कामेही पूर्ण करायची ताकद केवळ दिलीप वळसे पाटील यांच्यामध्ये असल्याचे मतदारांना सांगत आहेत.
वळती परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या राहणीमानात आर्थिक प्रगती झाली आहे. विकासकामांचे जनक म्हणून वळसे पाटीलच असल्याने त्यांना या भागातून मोठे मताधिक्य दिले जाईल
– किसनराव लोखंडे, माजी संचालक, भीमाशंकर कारखाना