मात्र, आडवाणी यांनी राजीनाम्याची धमकी दिल्याने ते घडले नाही
भोपाळ: गुजरातमध्ये 2002 साली घडलेल्या दंगलींनंतर त्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी असणाऱ्या नरेंद्र मोदी यांना हटवण्याची तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची इच्छा होती. मात्र, त्यावेळी लालकृष्ण आडवाणी यांनी केंद्रीय गृहमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची धमकी दिल्याने वाजपेयींनी तो निर्णय घेतला नाही, असा दावा भाजपला रामराम ठोकणारे माजी केंद्रीय मंत्री यशवंस सिन्हा यांनी शुक्रवारी केला.
भाजपच्या विद्यमान नेतृत्वावर सातत्याने टीकास्त्र सोडत सिन्हा यांनी काही महिन्यांपूर्वी तो पक्ष सोडला. येथे पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी मोदी आणि त्यांच्या सरकारवर तोफ डागली. एवढेच नव्हे तर, गुजरात दंगलींचा संदर्भ देत मोदींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. गुजरात दंगलींनंतर मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी वाजपेयी यांची इच्छा होती.
गोव्यात 2002 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्या बैठकीला जाताना वाजपेयी यांनी मोदींनी राजीनाम्यास नकार दर्शवला तर गुजरात सरकार बरखास्त करण्याचे मन बनवले होते. मात्र, माझ्या माहितीप्रमाणे पक्षांतर्गत बैठकीत आडवाणी यांनी त्या निर्णयाला विरोध केला. आडवाणी यांनी केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिल्याने वाजपेयी यांनी संबंधित निर्णय घेण्याचे टाळले आणि मोदी मुख्यमंत्रिपदावर कायम राहिले, असे सिन्हा यांनी म्हटले.