मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी झाला. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ४३ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी नारायण राणे यांचा शपथविधी सर्वप्रथम पार पडला. राणे यांना हा मान देण्यात आल्याने याबाबत सर्वत्र चर्चा रंगली होती.
शपथविधीनंतर राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी नितीन गडकरी यांच्याकडे या मंत्रालयाचा कार्यभार होता.
दरम्यान, नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी, शिवसेनेला याचा कोणताही फरक पडणार नसल्याचं म्हटलंय. वैभव नाईक व राणे कुटुंबीयांमध्ये राजकीय वैमनस्य असून अनेकदा त्यांच्यामध्ये खटके उडाल्याचंही समोर आलंय.
राणे यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ही शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची खेळी असल्याचं बोललं जात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुका लक्षात घेऊन राणे व कपिल पाटील यांना संधी देण्यात आल्याची चर्चाही राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.
याच पार्श्वभूमीवर, वैभव नाईक यांनी राणे यांना मंत्रिपद मिळाल्याबाबत वक्तव्य केलं आहे.
वैभव नाईक यांनी याबाबत बोलताना, “राणेंना केंद्रीय गृहमंत्री केलं तरी शिवसेनेला फरक पडत नाही. याआधीच सेनेनं, कोकणानं राणेंना धडा शिकवलाय” अशी टिपणी केली.
दरम्यान, राणेंचे मंत्रिपद शिवसेनेला शह देण्यासाठी असल्याच्या चर्चा भाजप नेते व महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावल्या आहेत. ‘राणे यांना मंत्रिपद देताना केवळ त्यांच्या क्षमतांचा विचार करण्यात आलेला, याव्यतिरिक्त अन्य कशाचाही विचार करण्यात आला नाही.’ असं फडणवीस यांनी सांगितलं.